विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोटाळा असल्याचे आरोप गेले अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून होत आहेत. विधानसभेत महायुती सरकारचा दणदणीत विज...
विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोटाळा असल्याचे आरोप गेले अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून होत आहेत. विधानसभेत महायुती सरकारचा दणदणीत विजय झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यामागे वोटचोरीचा सपाटा लावला.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाची दोनदा भेट घेतली. या भेटीतून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने विरोधी पक्षातील पक्षप्रमुख, मुख्य नेते यांनी पत्रकार परिषद बोलावली व मतचोरीचे पुरावे सर्वांसमोर मांडले. मतचोरीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील गोरेगाव, नेस्को सेंटर येथे राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेचा मेळावा पार पडला. तसेच दुपारी विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासहित इतर नेते उपस्थित होते.
यावेळी संजय राऊत यांनी एक महत्वाची घोषणा केली. "गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष लढाई लढत आहेत. ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत लढतोय आणि आता महाराष्ट्रात देखील लढतोय. त्यातून काय निष्पन्न होईल याविषयी शंका आहे. आजच मनसेचा फार मोठा मेळावा गोरेगावला पार पडला आणि तेथे राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले. त्यांनी सांगितलं की, मतदान करा किंवा करू नका निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे. आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीमध्ये ९६ लाख बोगस मतदार आजही आहेत. जवळजवळ हे १ कोटी मतदार हे आमच्या दृष्टीने घुसखोरच आहेत आणि या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे. कालच या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्यांच्या भाषणात सांगितलं की, आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर काढू. या निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे देशाचे गृहमंत्री असतात आणि आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले १ कोटी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करा."
त्यांनी पुढे काही उदाहरणे देऊन सत्ताधारी पक्षातील आमदारांनी बोगस मतदान केल्याचे स्वतःहून सांगितल्याचे सर्वांसमोर सांगितले. " अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात मतदार यादीमध्ये घोटाळा करून हे लोक सत्तेवर येतायत. आलेले आहेत. मतदार याद्या पवित्र असायला पाहिजेत, शुद्ध असायला पाहिजेत यासाठी हा संघर्ष आहे. निवडणुका स्वच्छ, पारदर्शक असायला पाहिजेत यासाठी महाराष्ट्रतील सर्व प्रमुख पक्ष सत्ताधारी वगळून लढतायत. दोन दिवस सातत्याने निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे होते. आमच्याकडून लोक होते. कॉम्रेड प्रकाश रेड्डी होते त्यांच्या पक्षातून लोक होते. कॉम्रेड नवले होते, समाजवादी पक्षाचे लोक होते. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष उपस्थित असून आम्ही ज्या आमच्या भूमिका मांडल्या त्या मानायला ते तयार नाहीत. आणि आमच्या याद्या या निर्दोषच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरं म्हणजे निवडणूक आयोगाने गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं आहे आणि ते ऐकायला तयार नाहीत. त्यानंतर सर्वांचं एकमत असं झालेलं आहे की यांना रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल. १ नोव्हेंबर रोजी शनिवार निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल. महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून, गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले अनेक लोक येथे येतील. मतदारांची जी ताकद आहे ती प्रधानमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगाला दाखवली जाईल. या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच महाविकास आघाडीतील इतर जे ज्येष्ठ नेते आहेत ते करतील. आणि पुढे महत्वाची पावले उचलली जातील."
"हा दणका निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे, की महाराष्ट्र स्वस्थ बसलेला नाही, झोपलेला नाही, अजगाराप्रमाणे पडलेला नाही. तुम्ही जर आमच्यापुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे. १ नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा दिवस असेल. देशाच्या लोकशाहीसाठी दिल्ली येथे आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारचा एक मोर्चा आम्ही नेला होता. आणि यात अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. त्यात शरद पवार सुद्धा होते, आमदार, खासदार देखील होते. अशाच प्रकारचा मोर्चा महाराष्ट्रातदेखील होईल." संजय राऊत यांनी केलेल्या या घोषणेमुळे आता सर्वांचे लक्ष हे १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाकडे लागलेले आहेत. हा मतदार याद्यांचा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


COMMENTS