गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे संसार अतिवृष्टीमुळे कोलमडले आहेत. जमीन खरडून गेली आहे, पिकांची ...
गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे संसार अतिवृष्टीमुळे कोलमडले आहेत. जमीन खरडून गेली आहे, पिकांची नासधूस झाली आहे. शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्री आणि नेते बांधावर पोहोचलेले आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे आठ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे. सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
याबद्दल माहिती देताना ते म्हणाले," रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यासंदर्भातल्या सूचना दिल्या. विशेषतः आता ज्या लोकांना रिलीफ कॅम्पमध्ये हलवण्यात आले आहे त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे. यासोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था आपण केली आहे. २००० कोटी रुपये अगोदरच रिलीज करण्यात आलेले आहेत. त्याचं वाटपदेखील सुरु केलेलं आहे. यासोबतच ज्याठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे १०००० रुपये देणं याचीदेखील सुरुवात केलेली आहे." अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुढे ते म्हणाले,"ठिकठिकाणी लोकांना रेशनच्या किट, अन्नधान्य वाटण्याची सुरुवात झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, खालची यंत्रणा योग्यप्रकारे काम करते आहे की नाही ते बघा. तुम्ही पण फिल्डवर रहा. आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झालेला आहे. त्यामुळे त्या निसर्गाचा अंदाज घेऊन, कुठे पाणी शिरतं याचा अंदाज घेऊन लोकांना पहिलं बाहेर काढणं अशाप्रकारचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. आजचा दिवस तर क्रिटिकल आहेच पण उद्याचा दिवसही क्रिटिकल आहे. बे ऑफ बेंगॉल मध्ये हे जे डिप्रेशन सुरु झालेलं आहे ते कमी होत जाणार आहे. आणि त्यानंतर परतीचा पाऊस असेल. त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला सांगितलेली आहे. हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची मानसिकता सरकारची आहे. म्हणून सरसकट पंचनामे करण्याचे सांगितले आहे. कुठेही फार कायद्यांवर, नियमांवर बोट ठेऊन लोकांना त्रास होईल असं वागू नका." अशा सूचना अधिकाऱ्यांना दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सर्व नुकसानीची माहिती आल्यानंतर अधिकची काय मदत करायची याचा निर्णय सरकार घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


COMMENTS