श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी ...
श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्याच्या सहकार्याची ओळख दक्षिण काश्मीरमधील मोहम्मद युसुफ कटारिया (वय २६) अशी आहे. युसुफ कटारिया जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षक आहे. कटारिया हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायिक कोठडीत पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन महादेवच्या दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रांच्या आणि इतर साहित्याच्या विश्लेषणानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांच्या दळणवळणात मदत आणि त्यांना सुविधा पुरवण्यात कटारियाची महत्त्वाची भूमिका होती. दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नेटवर्क विरोधात मोठं यश मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कटारियाच्या सहकाऱ्यांची ओळख पटवणे आणि लष्कर-ए-तोयबा (टीआरएफ)शी संबंधित नेटवर्क उद्धवस्त करण्यासाठी पुढील चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांचं मॉड्यूल कमजोर करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरमध्ये शांतता सुनिश्चित करण्यासाठी अभियान सुरु ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद यूसुफ कटारिया पहलगाममध्ये स्थानिक मुलांना शिकवण्याचे काम करायचा. मात्र, काही महिन्यांपूर्वी तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्यांना मदत करु लागला होता.
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन महादेवमध्ये ठार केलेल्या लष्कर दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या उपकरणे आणि शस्त्रास्त्रांची तपासणी केल्यानंतर पोलिस मोहम्मद कटारिया पर्यंत पोहोचले. ऑपरेशन महादेवमध्ये सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले होते. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन दरीत दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती. या २६ मृतांपैकी २५ जण पर्यटक होते, जे भारताच्या वेगवेगळ्या भागातून काश्मीरला फिरायला आले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता.
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांचा नाश केला. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जाते. मात्र, पहलगामच्या गुन्हेगारांची शोध मोहीम ऑपरेशन महादेवमुळे पूर्ण झाली. ऑपरेशन महादेवमध्ये सुरक्षा दलांनी जुलैच्या अखेरीस त्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार केलेले हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते. हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा उर्फ सुलेमान हा पाकिस्तानातील रावलकोट येथील होता. तर अबू हमजा उर्फ हॅरिस हा पाकिस्तानच्या सियालकोटचा आणि मोहम्मद यासिर हा देखील पाकिस्तानचा रहिवासी होता. आता या घटनेत सहभागी असलेल्या त्यांच्या एका सहयोग्याला पोलिसांनी अटक केली आहे.


COMMENTS