पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगानं पडत असली तरी बेसावध राहून चालणार नाही. अमेरिकेसारख्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगानं पडत असली तरी बेसावध राहून चालणार नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेनं आयातशुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय.
पण जगातली आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताला आता जगातला कोणताही नेता रोखू शकणार नाही. प्रगतीचा आणि विकासाचा हा महारथ कोणीच थांबवू शकणार नाही. आत्मनिर्भर भारत हा कुठल्याशी शक्तीपुढे झुकणारा नाही, हे मी खात्रीनं सांगतो. भारत झुकणार नाही आणि महाराष्ट्रही झुकणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्रीकांत पाठक, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ.पवन बनसोड, पंकज शिरसाट, सुभाष बुरसे, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ठाणे महानगरपालिका उपायुक्त मधुकर बोडके, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, उपसंचालक सीमा पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, उपअधीक्षक भूमी अभिलेख सचिन वाघ, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, तहसिलदार संदिप थोरात, उमेश पाटील, सचिन चौधर, रेवण लेंभे, प्रदीप कुडाळ, उज्वला भगत, स्मिता मोहिते, अमोल कदम, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, गोरख फडतरे, गिरीश काळे, उमेश महाला, दत्तात्रय बेर्डे, सहायक संचालक (नगररचना) दिशा सावंत, व्यवस्थापक अश्विनी कोकाटे, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरुवातीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्यसैनिक यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करून तमाम नागरिकांना तसेच देशात-परदेशात आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाची नवी क्षितिजे गाठत असलेल्या प्रत्येक मराठी माणसाला स्वातंत्र्यदिनाचा शुभेच्छा देत म्हणाले की, लोकशाहीतला सर्वात पवित्र असा सण म्हणजे आजचा दिवस आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. पारतंत्र्याच्या बेड्या तोडून आपला देश स्वतंत्र झाला, त्याला आता 79 वर्ष उलटली आहेत. स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली नसती, रक्त सांडलं नसतं, तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो. प्रगतीच्या पाऊलखुणा, विकासाची ही घोडदौड आपल्याला पाहायला मिळाली नसती. त्यामुळे केवळ स्वातंत्र्यदिनीच नाही तर शहिदांचं स्मरण आपल्याला सदैव व्हायला हवं.
ते म्हणाले की, देश बदलतोय, विकासाचे वारे वाहू लागले आहेत. दहा वर्षापूर्वी आपल्या देशाची अर्थव्यवस्था पहिल्या दहातही नव्हती. ती आज पहिल्या पाच देशात मोजली जाते, आणि लवकरच ती जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल. भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला पटली आहे. आज आपला भारत देश महासत्तांच्या डोळ्याला डोळे भिडवून स्वाभिमानानं उभा आहे! "विकसित होता है देश हमारा, रंग लाती है हर कुर्बानी, फक्र से हम अपना परिचय देते, हम सभी है हिन्दुतानी…" देशाची प्रगती अनेकांना बघवत नाही. त्यामुळे आपले शत्रूसुध्दा वाढलेत. पण, हम भी किसीसे कम नही हे आपण दाखवून दिलं आहे. आमच्या आयाबहिणींचं कुंकू पुसण्याचं धाडस करणाऱ्या पाकिस्तानचं कंबरडं ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्यानं मोडलं. सहा पाकिस्तानची विमानं सुदर्शन प्रणालीनं काही मिनिटात पाडली. पुन्हा नांगी वर काढता येणार नाही, अशी पाकिस्तानची नांगी ठेचली आहे. देशाच्या सरहद्दीवर आपल्या फौजा डोळ्यात तेल घालून संरक्षण करत आहेत. मी त्यांनाही वंदन करतो. सॅल्यूट करतो.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर झालेल्या विकासयात्रेत महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे. महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येतेय. केंद्राच्या लोकाभिमुख योजना महाराष्ट्रानं हिरीरीनं राबवल्या. इतकंच नव्हे तर गेल्या तीन वर्षात विक्रमी लोककल्याणकारी योजना महाराष्ट्राने राबविल्या. जनतेच्या आयुष्यात आनंद आणला. देशाच्या नकाशावर महाराष्ट्रानं आपल्या कामगिरीनं नाव कोरलं आहे. मोठ्या प्रमाणात आलेली विदेशी गुंतवणूक असो, किंवा दुर्बल, गोरगरीबांसाठी नाविन्यपूर्ण योजना असो, महाराष्ट्रानं आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. जेव्हा आपण विकसित भारत असं म्हणतो तेव्हा, महाराष्ट्राचं योगदान यात खूप मोठं असणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र म्हटला म्हणजे ठाण्यासारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या जिल्ह्याचे योगदानही तितकंच महत्वाचं आहे. गेल्या सात आठ वर्षात ठाणे जिल्ह्याला आघाडीवर आणलं आहे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात 3 हजार कोटींचा निधी ठाण्यातल्या विकास कामांना दिल्याने विकासाला गती आली आहे. आज राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे. मोठ्या प्रमाणावर कुशल व कुशल मनुष्यबळ इथं आहे. मुंबई खालोखाल शहरीकरण झालेला हा जिल्हा आहे. सर्वात जास्त म्हणजे 6 महानगरपालिका, 2 नगरपालिका, 2 नगर पंचायती पण या जिल्ह्यात आहेत. आज ठाण्याचा चेहरा मोहरा बदलतोय. ठाणे शहरच नाही तर, संपूर्ण जिल्हा हे एमएमआरमधले नवे मध्यवर्ती केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पांसाठी चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यात नव्या मेट्रो लाईनपासून बुलेट ट्रेन पर्यंत आणि एक्स्प्रेस हायवेपासून, फ्लायओव्हर्स, बोगद्यांचा समावेश आहे. क्रांतिकारी नवीन गृहनिर्माण धोरण आम्ही जाहीर केलं. ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, पोलीस, पत्रकार, त्याचबरोबर गिरणी कामगारांना घरं कशी मिळतील हे आम्ही युद्ध पातळीवर पाहतो आहोत. पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत असलेले अनेक प्रकल्प आहेत. त्यातले अडथळे दूर करून या कामाला गती देतो आहोत.
ते पुढे म्हणाले की, काल वरळीच्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना आम्ही नव्या घराच्या किल्ल्याही दिल्या. मी मुख्यमंत्री असताना या कामाला गती दिली होती. समृद्धी महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातला शेवटचा टप्पा पूर्ण झाला. त्यामुळं मुंबई ते नागपूर अशी सुपरफास्ट वाहतूक सुरु झाली आहे. वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला भरवीर इथं आम्ही जोडतोय. इस्टर्न फ्री वेचं एक्स्टेंशन आता ठाण्यापर्यंत येणार आहे. तिथून पुढे गायमुखपर्यंत कोस्टर रोड करतो आहोत. ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगद्यामुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटेल. याशिवाय सप्टेंबरमध्ये मेट्रोची ट्रायल रन सुरू होईल. या वर्षाच्या शेवटी तुम्ही मेट्रोतून प्रवास करू शकता. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पालाही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. रुंद रस्ते, मोठी उद्याने, गायमुख चौपाटीसारखे प्रकल्प सुरु आहेत. क्लस्टरच्या रूपाने 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे.
श्री.शिंदे म्हणाले की, ठाण्यानं नेहमीच कला, संस्कृतीचे जतन केलं आहे. ठाण्याचा मानबिंदू असे राम गणेश गडकरी रंगायतन नव्या अद्ययावत रुपात आजपासून सुरु होतेय. केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवतोय. पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी सुद्धा वेगानं सुरु आहे. अत्यल्प उत्पन असलेल्या गरिबांना घरे बांधून देण्यात येत आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात 60 जणांना उद्योग व्यवसायासाठी सुमारे दोन कोटी मार्जिन मनी देण्यात आला. 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानही सुरू होईल. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणं आणि उत्कृष्ट संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारही देणार आहोत. या काळात ग्रामसभाही घ्यायच्या आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करायची आहे. नेहमीप्रमाणे ठाणे जिल्ह्यानं राज्यात आघाडी घ्यायची आहे. लाडकी बहिण सारख्या योजना आपण यशस्वीरीत्या राबवल्या. ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला’ अभियान” सुरु झालं आहे. महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी करण्यात येत आहे. यंदापासून आपण राज्यात आदिशक्ती अभियान राबवणार आहोत. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजात जनजागृती निर्माण करणारं हे अभियान आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे जिल्ह्यात समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात ठाणे पालिकेचा पहिला क्रमांक आला आहे. ई ऑफिसमुळे पालिकेत सुसूत्रता व पारदर्शकता आली आहे.
COMMENTS