घाणेगाव (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या गावातील हिम्मराव भोईटे हे १९६१ मध्ये लष्करात भरती झाले होते. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि ...
घाणेगाव (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या गावातील हिम्मराव भोईटे हे १९६१ मध्ये लष्करात भरती झाले होते. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धामध्ये ते प्रत्यक्षात सहभागी झाले होते. युद्धामध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल माजी राष्ट्रपती आर वेंकटरामन यांच्याकडून प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले होते. लष्करातील २८ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर १९८९ मध्ये आसाममधून ते सेवानिवृत्त झाले होते. लष्करातील आणि दोन्ही युद्धातील आठवणी ते नेहमी सांगत. युद्धामध्ये लढत असताना शत्रूवर केलेला हल्ला, गोळ्या अथवा बॉम्बचा अनुभव सांगायचे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती व्यवसायात लक्ष घातले होते. अल्पावधीतच प्रगतशील शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परिसरामध्ये नाना या नावाने ते परिचीत होते.
हिम्मतराव भोईटे यांचे सोमवारी निधन झाल्यानंतर मंगळवारी (ता. ५) घाणेगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घाणेगाव या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्या नानांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली. नाना यांनी संपूर्ण आयुष्यात अनेकांना मोलाचे सल्ले देतानाच कोणासोबतही भांडण केले नसल्याच्या अनेक आठवणी ग्रामस्थांनी सांगितल्या. नानांच्या निधनामुळे गावची मोठी हानी झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. प्रगतशील शेतकरी राजू आणि दिपक हे त्यांचे पुत्र होत तर आयटी इंजिनिअर आकाश भोईटे हे त्यांचे नातू होत. मुलांसोबत सून छाया आणि लता यांनी त्यांची मोठे सेवा केली. नाना यांनी कुटुंबाला बांधून ठेवले होते. नानांच्या सल्ल्यानंतर गावातील अनेक युवक लष्करात सहभागी झाले आहेत.


COMMENTS