विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अतिप्रचंड यशामुळे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष नाममात्र उरल्याची चर्चा सा...
विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अतिप्रचंड यशामुळे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष नाममात्र उरल्याची चर्चा सातत्याने होत असते.
अशातच भाजप (BJP) आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याचे संकेत देणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वगळण्यात आले आहे. मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. मुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्याने या समितीच्या प्रमुखपदाची सूत्रं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहेत. या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्थान देण्यात आले आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांना या समितीमधूनच वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अजित पवार यांच्यासह महसूल, मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्री आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री असूनही त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
COMMENTS