१ जुलै २०१५ रोजी काश्मीरमध्ये फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे खळबळ उडाली. त्या फोटोत ११ स्थानिक काश्मीरी युवक लष्करसदृश गणवेशात हात...
१ जुलै २०१५ रोजी काश्मीरमध्ये फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे खळबळ उडाली. त्या फोटोत ११ स्थानिक काश्मीरी युवक लष्करसदृश गणवेशात हातात रायफल घेऊन दिसत होते. या फोटोत केंद्रस्थानी होता तो म्हणजे हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान-उद-दिन वानी उर्फ बुरहान वानी… बुरहान वानीने काश्मीरात दहशतवादाचा एक नवा चेहरा समोर आणला होता.त्याने स्वत:चे व साथीदारांचे हातात रायफल घेतलेले फोटो, व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यास सुरूवात केली होती. या माध्यमातून त्याने काश्मीरी युवकांना चिथावण्याचा प्रयत्न केला होता. साधारणपणे, दहशतवादी त्यांची ओळख उघड करत नाहीत. परंतु, बुरहान वानीने फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख उघड करून सुरक्षा दलांना आव्हान दिले होते.
बुरहान वानीच्या या कृत्यांमुळे काश्मीर मधील सुशिक्षित तसेच चांगल्या घरातील तरूण दहशतवादाकडे वळण्याचा धोका निर्माण झाला होता. १९९० नंतर पहिल्यांदाच मोठा धोका काश्मीरमध्ये निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी काश्मीर मधील दहशतवादाची परिस्थिती आता बदलली आहे. दहशतवादी संघटनांमधील भरती ते दहशतवादी हल्ले व त्यात होणाऱ्या मृत्यूंमध्ये घसरण झाली आहे. असे असले तरी काश्मीरमध्ये ‘ग्राउंड’वरील परिस्थिती मात्र क्लिष्ट, गुंतागुंतीची असल्याने सतत अलर्ट मोडवर राहणे आवश्यक आहे, असे एका उच्चपदस्थ सुरक्षा अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
काश्मीरमधील परिस्थिती काय?
बुरहान वानीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, त्याच्या पुढील वर्षात म्हणजेच २०१६ मध्ये दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या १५७ जणांना भारतीय सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. २०१८ मध्ये २६६, तर २०२० मध्ये २३० जणांचा भारतीय सुरक्षा दलाने खात्मा केला. दरम्यान, यात घट झाली असून चालू वर्षात १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. २०१८ मध्ये भारतीय सुरक्षा दलाचे ९४ जवान शहीद झाले होते, तर चालू वर्षात एक जवान शहीद झाला आहे. हेच सामान्य नागरिकांच्या बाबतीतही दिसून येते. दहशतवादी हल्ल्यांमध्ये २०१८ मध्ये ८८ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर चालू वर्षात एक सामान्य नागरिक मृत्युमूखी पडला आहे.
“एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काश्मीरमधील शांतता पाहू शकता. हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हल्ल्यांमध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्येही घट झाली आहे. तसेच अटक व एफआयआर दाखल होण्याची संख्याही रोडावली आहे”, अशी माहिती दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. “पण, एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या दृष्टीने तुम्ही पाहिले तर अजूनही काश्मीरमध्ये आव्हाने कायम आहेत”, असे त्यांनी सांगितले.काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय?
लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी झाकीर अहमद गणी याला दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी बुधवारी (८ जुलै) ठार केले. काश्मीरमध्ये सध्या सक्रिय असलेल्या केवळ दोन स्थानिक दहशतवाद्यांपैकी तो एक होता. लतीफ नावाच्या दुसऱ्या स्थानिक काश्मीरी दहशतवाद्याचा शोध सुरक्षा दल घेत आहे. पाकिस्तानातून आलेले दहशतवादी काश्मीरमध्ये सध्या सक्रिय आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांची संख्या ३० च्या आसपास आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी आता शहर किंवा गावांमध्ये आश्रय घेणे किंवा वास्तव्य करणे बंद केले आहे. त्याऐवजी उंच डोंगराळ भागातील घनदाट जंगलांमध्ये दहशतवादी आश्रय घेत आहेत. तसेच सोशल मीडियावर ते निनावी खाते उघडून सक्रिय असतात.
“बुरहान मॉडेल”
जम्मू काश्मीर मधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “दहशतवाद्यांच्या विरोधात राबवल्या जाणाऱ्या मोहीम मुख्यत: मानवी गुप्तचर माहितीच्या (ह्युमन इंटेलिजन्स – ह्युमिंट) आधारावर पार पाडल्या जातात. तर तंत्रज्ञानाच्या आधारे मिळणाऱ्या गुप्तचर माहितीमुळे (टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स – टेकिंट) दहशतवाद्यांचे ठिकाण (लोकेशन) कळते. तसेच त्यांच्यावर बिनचूकपणे हल्ला करता येतो. एक सुरक्षा अधिकारी किंवा गुप्तचर अधिकारी म्हणून पाहिले असता सुरक्षेबाबतची परिस्थिती एकंदरीत सुधारल्याचे दिसते. पण, या परिस्थितीतही काही नवीन आव्हाने सुरक्षा दलांसमोर आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.
१ जुलै २०१५ रोजी ११ काश्मीरी युवकांचा फेकबुकवर व्हायरल झालेला फोटो, मध्यभागी बुरहान वानी (फाइल फोटो)
दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, दहशतवादाचे “बुरहान मॉडेल” हा एक अपवाद होता. बुरहान वानीचे मॉडेल दीर्घकाळ टिकणारे नव्हते. तरूणांना मोठ्या संख्येने जोडण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा वापर केला असेल, पण ज्या दराने (डेथ रेट) भारतीय सुरक्षा दलाने त्यांना संपवले त्याकडेही तुम्ही पाहा. त्यामुळे बुरहान वानीचे मॉडेल शाश्वत नव्हते. हे समजण्यासाठी त्यांना (दहशतवाद्यांना) चार वर्षे लागली.” दरम्यान, वरील फोटोतील सर्व ११ दहशतवाद्यांचा भारतीय सुरक्षा दलाने खात्मा केला होता.काश्मीरमधील दहशतवादाची सुत्रे कोणाच्या हाती?
काश्मीरमधील दहशतवादाची सुत्रे आता स्थानिक काश्मीरींऐवजी पाकिस्तानमधून भारतात आलेल्या दहशतवाद्यांनी हातात घेतली आहेत, हा एक मोठा बदल आहे. “२०१९ नंतर हिजबूल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना जवळपास संपुष्टात आली. त्यानंतर तिची जागा लष्कर-ए-तय्यबाने घेतली. लष्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी उच्च प्रशिक्षित आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. हल्ला करताना धोरणात्मकदृष्ट्या फायदा होईल, अशा ठिकाणी हे दहशतवादी लपतात. जसे की उंचावर असलेली घनदाट जंगले! दहशतवादी कृत्यांचे कमांड आणि कंट्रोल दोन्हीही आता पाकिस्तानमधून आलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांच्या हातात आहे”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
बुरहान वानीचा खात्मा कसा झाला?
८ जुलै २०१६ रोजी सुरक्षा दलांनी एक संयुक्त मोहिम राबवली होती. २२ वर्षीय बुरहान वानी अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागातील एका घरात दडून बसला होता. त्याच्याबरोबर त्याचे अन्य दोन साथीदार होते. हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर असलेल्या बुरहान वानीची सुरक्षा दलासोबत चकमक उडाली. सुरक्षा दलाने चकमकीत बुरहान वानीसह त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांचा खात्मा केला. त्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यात अनेक स्थानिक काश्मीरी नागरिकांचा मृत्यू झाला. काश्मीर मधील परिस्थिती चिघळली होती. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये दगडफेकीचे प्रमाणही वाढले होते.


COMMENTS