गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार का? राज्यातील शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेली असतानाच, भारतीय हव...
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार का? राज्यातील शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेली असतानाच, भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.
मागील आठवड्यात धुमाकूळ घातल्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात वेगाने बदल होत असून मॉन्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात लवकरच कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे.
येत्या सोमवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे, मराठवाड्यातील काही भागांसह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कोकणातील रत्नागिरी परिसरातही पाऊस चांगली हजेरी लावणार आहे.
सध्या मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा देशातील श्रीनगर, रोहतक, मुझफ्फरपूर आणि शाहजहानपूर परिसरात सक्रिय आहे. तसेच तेलंगणापासून कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळेच देशाच्या पूर्व आणि मध्य भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, पर्वतीय प्रदेशात भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, हा प्रभाव असूनही देशात समाधानकारक पाऊस होताना दिसतोय. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून आता ते या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याने प्रशासनालाही अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे.


COMMENTS