गेले दोन-तीन दिवस उघडीप दिलेल्या पावसाने आणि अचानक वाढलेल्या उकाड्याने तुम्हालाही हैराण केलंय का? जर तुम्ही आता सुटकेचा निश्वास टाकत असाल,...
गेले दोन-तीन दिवस उघडीप दिलेल्या पावसाने आणि अचानक वाढलेल्या उकाड्याने तुम्हालाही हैराण केलंय का? जर तुम्ही आता सुटकेचा निश्वास टाकत असाल, तर जरा थांबा; कारण भारतीय हवामान विभागाने (IMD) नव्या पावसाळी संकटाचा मोठा इशारा दिला आहे.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह देशातील तब्बल १८ राज्यांमध्ये येत्या काही तासांत अतिवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताशी ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
IMD Weather Forecast: महाराष्ट्रात काय असणार पावसाची स्थिती?
सध्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. यूपी, बिहार, दिल्ली, पंजाबपासून ते थेट कर्नाटक आणि केरळपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्राचा विचार केला तर १ ते ८ जुलैदरम्यान पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून काढले होते. पालघर, पुणे आणि रायगडमध्ये अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, सध्या पावसाने राज्यात थोडी विश्रांती घेतली असून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तापमान चक्क ३२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
पण ही उघडीप केवळ तात्पुरती असू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या २४ तासांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो. याबाबत हवामान विभागाकडून अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.


COMMENTS