नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 'ऑनस्क्रीन मार्किंग' (ओएसएम) प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या ...
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 'ऑनस्क्रीन मार्किंग' (ओएसएम) प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या 'निराशे'बद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी चिंता व्यक्त केली.
याप्रकरणी सुधारणांसाठी 'सीबीएसई'ने काय पावले उचलली, याबाबत माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांना दिले.
'ओएसएम' प्रणालीद्वारे परीक्षा घेण्याच्या नियमनिश्चितीसाठी केंद्र सरकार आणि 'सीबीएसई'ला निर्देश देण्याच्या विनंतीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 'मुलांमध्ये असलेल्या निराशेचे प्रमाण पाहा', असे सांगतानाच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तुषार मेहता यांना या प्रकरणात साह्य करण्याची सूचना केली.
'ओएसएम' प्रणालीत शिक्षकांद्वारे उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत तपासून मूल्यांकन केले जाते. 'डिजिटल मूल्यांकन प्रक्रियेत काहीतरी सुप्त समस्या असल्याचे दिसते', अशी टिप्पणी न्या. जॉयमाल्या बागची यांनी केली. 'काहीतरी समस्या दिसत असल्याने आम्ही तुमच्याकडे मदतीची मागणी करीत आहोत', असे न्या. बागची मेहता यांना उद्देशून म्हणाले.
'या याचिकेत नमूद असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील विसंगतीचा मुद्दा निकाली काढण्यात आला असून, सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे', असे तुषार मेहता यांनी स्पष्ट केले. मूल्यांकन प्रणालीचा आढावा घेऊन त्यात आवश्यक बदल करण्यासाठी एस. राधा चौहान यांचा एकसदस्यीय आयोग नेमण्यात आला आहे. हा आयोग यासंदर्भातील तक्रारींमध्ये लक्ष घालत आहे, असेही मेहता यांनी नमूद केले. याप्रकरणी 'सीबीएसई'ने काय पावले उचलली, याची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने मेहता यांना देऊन सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली.
राकेश बिंजोला यांनी ॲड. लक्ष्मीकांत शुक्ला यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. परीक्षा पद्धतीतील सुधारणांची अंमलबजावणी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्याची विनंतीही याचिकेत केली आहे.
विरोध कायम!
पारंपारिक तपासणी पद्धती बदलून सीबीएसईने आणलेल्या या डिजिटल पद्धतीमध्ये खालील तांत्रिक टप्प्यांचा समावेश होतो:
स्कॅन उत्तरपत्रिका : विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उत्तरपत्रिका गोळा करून त्यांचे डिजिटल स्कॅनिंग केले जाते.
स्क्रीनवर मूल्यांकन : शिक्षक प्रत्यक्ष कागदी उत्तरपत्रिका न तपासता संगणकाच्या स्क्रीनवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुण देतात.
विसंगतीचा मुख्य मुद्दा: अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये प्रत्यक्ष उत्तरपत्रिका आणि स्क्रीनवर मिळालेले गुण यामध्ये मोठी तफावत आढळली असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतिम निकालात मोठे नुकसान झाले आहे, ज्याचा थेट संबंध विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी जोडला गेला आहे.


COMMENTS