कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतील आंदोलनानं आता आणखी तीव्र स्वरुपा धारण केलं आहे. सोमवारी झालेल्या मोर्चानंतरही अनेक तरुण अद्यापही आंदोलनस्थ...
कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतील आंदोलनानं आता आणखी तीव्र स्वरुपा धारण केलं आहे. सोमवारी झालेल्या मोर्चानंतरही अनेक तरुण अद्यापही आंदोलनस्थळी असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाहीच असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
मोर्चाच्यावेळी आंदोलकांची सरकारसोबत चर्चेची पहिली फेरी पार पडली पण त्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत. त्यामुळं आता सीजेपीच्या या आंदोलनाचं नेतृत्त करणाऱ्यांनी सरकारशी चर्चेबाबत आता मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत, त्याप्रमाणंच आता चर्चा केली जाईल असं सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलं आहे. यामुळं मोदी सरकार मात्र बॅकफूटवर जात असल्याचं आता चित्र आहे.
चर्चेसाठी कोणत्या अटी-शर्ती?
सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सरकारसोबत चर्चेसाठी कोणत्या अटी-शर्ती असतील हे स्पष्ट केलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दास यांनी सांगितलं की, सरकारच्या प्रतिनिधींनी आम्हाला मंत्र्यांच्या घरी येऊन चर्चेसाठी निमंत्रण दिलं. पण यासाठी नकार दिला.
चर्चेसाठी आम्ही कोणाच्या घरी जाणार नाही किंवा कोणाच्याही कार्यालयात जाणार नाही
जनता दरबार इथं लागला आहे त्यामुळं मंत्र्यांनी इथंच चर्चेसाठी यायला हवं. जर त्यांना चर्चा करायची आहे तर ही चर्चा आता जंतर-मंतरवरच होणार.
आम्ही देखील शिकलेले लोक आहोत त्यामुळं आम्ही विचार केला की, जर त्यांना भीती वाटत असेल की जर इथं काही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर त्यातल्या त्यात सुरक्षित जागा वाटेल अशा जंतर-मंतरजवळच आपण भेटू शकतो. पण अद्याप त्यांचं यावर कुठलंही उत्तर आलेलं नाही.
सरकारची ऐकण्याची इच्छा का नाही?
दुसरी गोष्ट म्हणजे सरकारची ही इच्छा असावी की त्यांना आमचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे आणि ते स्विकारायचं आहे, तेव्हाच त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवावं. टाईमपासच्या गोष्टी करण्यासाठी आमच्याकडं वेळ नाही. आमचा वेळ किंमती आहे, हजारोंच्या संख्येनं लोक अजूनही जंतर-मंतरवर ठाण मांडून आहेत. इथं संपूर्ण निषेध आंदोलन सुरु आहे तर त्यालाही सांभाळायचं आहे.
देशभरात आता आंदोलनाची ठिणगी
दरम्यान, सरकारची आमच्याशी चर्चा करण्याची इच्छा का असू नये? इथं इतक्या दिवसांपासून लोक बसलेले आहेत, लाखोंच्या संख्येनं लोक इथं आले होते २० तारखेला. काल देखील हजारोंच्या संख्येन लोक आंदोलनस्थळी आले आहेत. सध्या ४० ते ५० हजार तरुणांची गर्दी असेल नवी दिल्ली जिल्ह्यामध्ये. पण विशेष म्हणजे संपूर्ण देशभरात हे आंदोलन सुरु आहे. त्यामुळं सरकारनं यावर स्पष्टीकरण द्यावं की त्यांची इच्छा आहे की नाही.
मागण्या काय आहेत?
आंदोलकांच्या मागण्या काय आहेत? या पुन्हा सांगताना सौरव दास यांनी सांगितलं...
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.
ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या पेपर लीकमुळं आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई
इथं शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर सरकारनं विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घेण्यात यावेत.
या आंदोलनाशी संबंधित भविष्यातही शांततेत आंदोलन करणाऱ्या कोणत्याही आंदोलकाविरोधात अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जाऊ नयेत, याची गॅरंटी.


COMMENTS