विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात जागवत वारकरी पंढरपुरच्या दिशेने निघाले आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी २४ जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल. यंद...
विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात जागवत वारकरी पंढरपुरच्या दिशेने निघाले आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी २४ जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल.
यंदा २५ जुलै आषाढी एकादशीला माऊलींच्या चरणी लीन होतील. दरम्यान आज १८ जुलै रोजी पुण्याच्या इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीतील मानाच्या अश्वाच दुसरं गोल रिंगण पार पडलं.
दरम्यान या पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांचं नियंत्रण कसं केलं जातं याबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. या पालखी सोहळ्यात अब्दागिरी, जरीपटक्याचं विशेष महत्त्व आहे. हजारोंच्या पालखीवर मार्ग दाखविण्याचं काम या अब्दागिरीच्या माध्यमातून केलं जातं.
अब्दागिरी, जरीपटका म्हणजे एक प्रकारचं राजछत्र. प्राचीन काळापासून वैभव, समृद्ध आणि अधिकाराचं चिन्ह म्हणून याकडे पाहिलं जातं. शिवाजी महाराजांच्या काळात जरीपटक्याला विशेष महत्त्व होतं. महाराष्ट्रात अनेक यात्रांदरम्यान जरीपटका झळकताना दिसतो.
अब्दागिरी आणि जरीपटक्याचं महत्त्व काय आहे?
वारकरी संप्रदायात आणि संत तुकाराम महाराजांच्या वारीत अब्दागिरी आणि जरीपटक्यासोबत असलेली खास पालखीची छत्री हे आदर, पावित्र्य आणि ईश्वरी वैभवाचं प्रतीक मानलं जाते. याच्या माध्यमातून अख्ख्या पालखी सोहळ्यावर नियंत्रण ठेवलं जातं. अब्दागिरीच्या पुढच्या बाजूला गरुड आणि मागच्या बाजूला हनुमानाचं चित्र असतं. या अब्दागिरीसोबत जरीपटका आणि खास पालखीची छत्रीदेखील असते. पालखीच्या अग्रसाठी हे तिन्ही चिन्ह घेऊन वारकरी उभे असतात. अब्दागिरी थांबली की पालखी थांबते. अनेकदा बोलीभाषेत अब्दालीला पालखीचा डेंजर म्हटलं जातं. तर रिंगणादरम्यान जरीपटका घेऊन एक वारकरी गोल रिंगण घालतो. सर्व पताकेकरी जरीपटक्याच्या मागून धावत असतात.


COMMENTS