मुंबईमध्ये खराब भाजीपाला आणि फळे विकून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. भाज्या अधिक काळ ताजी दिसण्यासाठी घातक रास...
मुंबईमध्ये खराब भाजीपाला आणि फळे विकून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. भाज्या अधिक काळ ताजी दिसण्यासाठी घातक रासायनिक रंगांचा व फळांवर उंदीर मारण्याचे विष लावण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.अशा भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई सुरू केली आहे. अशातच आता वाशी मार्केटमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. खराब झाल्याने कचऱ्यात फेकलेल्या भाज्या पुन्हा पॅकिंग करुन विक्रीसाठी आणल्या जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाशी मार्केटमधील या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे.
कचऱ्यातील सडलेल्या भाज्या मुंबईकरांच्या ताटात
नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाजारात टाकाऊ म्हणून फेकून दिलेल्या किंवा खराब झालेल्या भाज्या गोळा करून, त्या पुन्हा स्वच्छ करून आकर्षक पॅकिंगमध्ये ग्राहकांना विकल्या जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मार्केटमध्ये फेकून दिलेल्या भाज्या साफ करुन गोळा केल्या जात आहेत. अक्षरश: सडलेल्या भाज्यांच्या ढिगांंमधून या भाज्या गोळा केल्या जात आहेत आणि साफ करुन पुन्हा त्याचे पॅकिंग केले जात आहे. वाशी एपीएमसी हे केवळ राज्याचेच नव्हे, तर देशातील एक प्रमुख बाजारपेठ मानले जाते. येथून मुंबईसह उपनगरांत मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचा पुरवठा होतो.
मात्र, या बाजारातील काही भागांत नियमांना हरताळ फासून कचऱ्यातील सडलेला भाजीपाला वेचण्याचे काम काही टोळ्यांकडून केले जात आहे. या भाज्यांवर प्रक्रिया करून त्या पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जात आहेत. यासंदर्भातील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून भाजी गोळा केली जात आहे. "ग्राहकांच्या ताटात थेट विष पोहोचवण्याचा हा प्रकार असून अशांवर कठोर कारवाईची मागणी आता होत आहे.


COMMENTS