आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. एका सरकारी नोकरीत असलेल्या, त्य...
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. एका सरकारी नोकरीत असलेल्या, त्यातही अत्यंत जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने अशा कार्यक्रमात जाऊन एका विशिष्ट संघटनेबद्दल जाहीरपणे निष्ठा दाखवणे कितपत योग्य आहे, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.नांगरे पाटील यांनी दाखवलेली ही दुहेरी निष्ठा त्यांच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून जर त्यांना संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन भाजप किंवा संघात सामील व्हावं असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केला आहे.
अशा प्रकारच्या राजकीय हेतू असलेल्या संमेलनांमध्ये पोलीस अधिकार्यांचे जाणे आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर मौन बाळगणे हे भविष्यासाठी अत्यंत चुकीचे पायंडे पाडणारे आहे. २०१२ मध्ये मनसेच्या मोर्चात पोलिसांचे अभिनंदन करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला तत्कालीन सरकारने तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले होतं, मग तोच नियम नांगरे पाटील यांना का लागू केला जात नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती केली आणि त्यावरुन राजकीय वाद सुरू झाला आहे. यावरुन काँग्रेस देखील आक्रमक झालं असून खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक? असा सवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
''आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.


COMMENTS