शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लागलेल्या मोठ्या सुरुंगानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सातत्याने तापलेले आहे. ठाकरेंच्या शिवसे...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लागलेल्या मोठ्या सुरुंगानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सातत्याने तापलेले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदार फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्याने दोन्ही गटातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी आता शिंदे गटाने थेट महिला नेत्याला मैदानावर उतरवले आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि खासदार ज्योती वाघमारे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली.
"राऊत म्हणजे महाराष्ट्राला लागलेली वाळवी!"
पत्रकार परिषदेत बोलताना ज्योती वाघमारे म्हणल्या, "संजय राऊत हे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या या अश्लील भाषेमुळेच आज महाराष्ट्रातील आया-बहिणींच्या सन्मानासाठी मला ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे," असे वाघमारे म्हणाल्या. राऊतांच्या जिभेला कुलूप राहिलेले नाही, त्यामुळे आता ठाकरे गटाच्या पक्षालाच कुलूप लावण्याची वेळ आली आहे. संजय राऊत तुमची जीभ म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेली वाळवी आहे. तुम्हाला कंटाळूनच लोक पक्ष सोडून जात आहेत. तुम्ही सध्या वैचारिक दिवाळखोरी जाहीर केली आहे, अशी टीका वाघमारे यांनी केली
'खोके' नव्हे, 'धोके' कारणीभूत
ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर ५० खोक्यांचे आरोप केले जातात. यावर पलटवार करताना वाघमारे म्हणाल्या, "पक्षातील नेते खोक्यांमुळे नाही, तर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या धोक्यामुळे पक्ष सोडून गेले आहेत." तसेच, "संजय राऊत हे आता ठाकरे गटाचे प्रवक्ते राहिले नसून, ते काँग्रेसचे सुपारीबाज झाले आहेत," असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
महाभारताचा संदर्भ: "उद्धव ठाकरे धृतराष्ट्र, तर राऊत शकुनी मामा!"
खासदार ज्योती वाघमारे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यातील संबंधांवर बोलताना थेट महाभारताचा दाखला दिला. "महाभारतामध्ये पुत्रप्रेमापोटी आंधळा झालेला एक धृतराष्ट्र होता आणि त्याला युद्धातील घडामोडी सांगणारा एक संजय होता. आज 'उबाठा' गटामध्येही पुत्रप्रेमामुळे आंधळे झालेले धृतराष्ट्र बसले आहेत. मात्र, हा आजचा संजय खरी परिस्थिती सांगण्याऐवजी 'शकुनी' झाला आहे. ज्या पद्धतीने शकुनी मामाने कौरवांचा वंश बुडवला, त्याचप्रमाणे संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचा पक्ष बुडवायला कारणीभूत ठरत आहेत." राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा' या घोषणेबाबत बोलताना त्या म्हणल्या, "हे ऑपरेशन तुडवा नाही, तर 'ऑपरेशन बुडवा आणि काँग्रेस वाढवा' अशी त्यांची रणनीती आहे," असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे 'राजकीय ढोंग'
सध्या उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांवर टीका करताना वाघमारे म्हणाल्या, "एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धसका घेतल्यामुळेच यांना माती खाण्याचे डोहाळे लागले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना आधीच 'लूझर' ठरवले आहे, ते आता काय 'टीझर' दाखवणार? सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे करणे हे निव्वळ राजकीय ढोंग आहे. आज उद्धव ठाकरेंसोबत कोणीच शिल्लक राहिलेले नाही.
राऊतांविरोधात तक्रार दाखल; ठाकरेंना सवाल
संजय राऊत हे सातत्याने महिलांचा अपमान करणारी वक्तव्ये करत असल्याचा आरोप करत वाघमारे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना थेट सवाल केला की, "राऊत ज्या शिव्या देत आहेत, त्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे समर्थन आहे का?"असा सवाल देखील उपस्थिती केला.


COMMENTS