पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहरात दाखल होत आहे. पुण्यात दोन...
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहरात दाखल होत आहे. पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणाऱ्या या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना मिळणार आहे.
वारकऱ्यांच्या आदरातिथ्यासाठी आणि सेवेसाठी पुणे महानगरपालिकेने यावर्षी ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणे शहराच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली आहे.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आवश्यक ती तयारी पुणे महापालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे. पुण्यात पालखी मुक्कामी असताना वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सोयीसुविधा कशाप्रकारे दिल्या जातील यासाठीचे नियोजन प्रत्येक स्तरावर केले जात आहे.
३ जुलै रोजी भव्य चित्रकला स्पर्धा
पालखी सोहळा ९ आणि १० जुलै रोजी पुणे शहरात मुक्कामी असणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून येत्या ३ जुलै रोजी महापालिकेच्या वतीने एका भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वारी’ या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर ही स्पर्धा पार पडणार असून, यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसह शहरातील विविध खासगी शाळांमधील विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वारीच्या परंपरेची ओळख निर्माण केली जाणार आहे.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोड सेवा देण्यावरून काय होता वाद? कसा निघाला सुवर्णमध्य?
यंदाच्या पालखी सोहळ्याचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पुणे शहरात एकाच वेळी सामूहिक ‘पसायदान’ म्हटले जाणार आहे. पालखी मुक्कामाच्या दरम्यान एका ठराविक वेळेत सर्वच पुणेकर नागरिकांनी एकत्रितपणे पसायदान म्हणावे, असे नियोजन महापालिकेने केले आहे. या उपक्रमाची वेळ निश्चित करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा देवस्थानचे विश्वस्त आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांशी चर्चा सुरू असून, त्यांच्या संमतीने लवकरच वेळ जाहीर केली जाईल, असे महापौर नागपुरे यांनी स्पष्ट केले.
महिला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांचे विशेष नियोजन
पालखी सोहळ्यादरम्यान लाखो महिला वारकरी पुणे शहरात येत असतात. मात्र, मध्यवर्ती भागातील स्वच्छतागृहांची अपुरी संख्या लक्षात घेता महिला वारकऱ्यांची मोठी कोंडी होते. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने विशेष पावले उचलली आहेत. पेठ भागातील खासगी सोसायट्या, व्यापारी संकुले, हॉटेल्स तसेच स्थानिक नागरिकांनी आपली घरगुती स्वच्छतागृहे महिला भगिनींसाठी खुली करून द्यावीत, यासाठी महापालिकेतर्फे व्यापक जनजागृती केली जात आहे. पुणेकरांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केले आहे.


COMMENTS