जळगाव : आषाढी वारीच्या काळात भुसावळहून पंढरपूरसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या वर्षभर कायमस्वरूपी सुरू करण्यात याव्यात, अशी मागण...
जळगाव : आषाढी वारीच्या काळात भुसावळहून पंढरपूरसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या वर्षभर कायमस्वरूपी सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आता खान्देशातील वारकरी, प्रवासी आणि विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण खान्देशातील हजारो भाविक दरवर्षी पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. यात्रेच्या काळात विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध होत असली, तरी वर्षभर थेट रेल्वे सेवा नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
यात्रेनंतर थेट रेल्वेचा पर्याय नाही
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. या काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून दरवर्षी ८० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जातात. मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, भुसावळसह विविध शहरांतून या गाड्या धावतात. मात्र या सेवा केवळ यात्रेपुरत्याच मर्यादित असल्याने उर्वरित काळात पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना थेट रेल्वेचा पर्याय उपलब्ध राहत नाही. जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होतात.
अनेक वारकरी पायी वारी करत असले, तरी ज्येष्ठ नागरिकांसह महिला, अपंग आणि कुटुंबासह प्रवास करणारे भाविक रेल्वेला अधिक पसंती देतात. याशिवाय वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, नवसपूर्ती आणि विठ्ठल दर्शनासाठीही हजारो प्रवासी पंढरपूरला जात असतात. मात्र भुसावळहून थेट नियमित रेल्वे नसल्याने मनमाड, दौंड किंवा इतर स्थानकांवर गाड्या बदलण्याची वेळ येते. त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढण्याबरोबरच अतिरिक्त खर्च आणि गर्दीचाही सामना करावा लागतो.
नाशिक-जळगावकर विठ्ठल दर्शनाला निघताय ? पंढरपूरसाठी सुटणार ४ विशेष गाड्या!
वारकऱ्यांची वाढती मागणी
भुसावळ हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असून जळगावसह धुळे, नंदुरबार आणि आसपासच्या जिल्ह्यांतील प्रवाशांचे प्रमुख रेल्वे केंद्र आहे. येथून पंढरपूरपर्यंत नियमित एक्स्प्रेस सेवा सुरू झाल्यास खान्देशातील भाविकांना मोठा दिलासा मिळेल. प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा ठरेल, असा विश्वास वारकरी व्यक्त करत आहेत. या मागणीसाठी विविध वारकरी संघटना, नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रशासनाला सातत्याने निवेदने देण्यात येत असून, लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाचा पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आषाढी यात्रेसाठी यंदा चार फेऱ्या
दरम्यान, यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त मध्य रेल्वेने नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर आणि भुसावळ-पंढरपूर या मार्गांवर विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०११५९ विशेष रेल्वे २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहचेल. तर गाडी क्रमांक ०११६० विशेष रेल्वे २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहचणार आहे. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबे देण्यात आले आहेत. या विशेष रेल्वेत १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे तसेच दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे.
नियमित एक्स्प्रेसची अपेक्षा कायम
भुसावळ ते पंढरपूर विशेष रेल्वेला दरवर्षी आषाढी यात्रेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वर्षभर पंढरपूरला प्रवास करणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता भुसावळ-पंढरपूर मार्गावर कायमस्वरूपी नियमित एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. वारकऱ्यांच्या श्रद्धेला आणि प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य देत या मागणीचा सकारात्मक विचार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


COMMENTS