पुण्यासह राज्याला युवा उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं हादरवलं आहे. सुरुवातीला लोहगडावरुन फोटो काढताना पाय घसरुन दरीत कोसळल्याचं समोर...
पुण्यासह राज्याला युवा उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं हादरवलं आहे. सुरुवातीला लोहगडावरुन फोटो काढताना पाय घसरुन दरीत कोसळल्याचं समोर आलं होतं. पण संशय वाढल्यामुळे पोलिसांनी केलेल्या तपासात होणार्या पत्नीनचं प्रियकराच्या मदतीनं केतनचा काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.तसेच पोलिसांच्या तपासामध्ये या प्रकरणी दिवसागणिक खळबळजनक खुलासे समोर येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
केतन अग्रवाल याच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याचदरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी(ता.26) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. याबाबत सीएमओकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मान्य केली आहे. याबाबतचे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहेत.
या हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सीएमोकडून ट्विटद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सीएमओच्या ट्विटमध्ये लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केल्याचं म्हटलं आहे.
तसेच या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिल्याचंही सीएमओच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेल्या केतन अग्रवाल याची त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने लोहगडावरुन 400 फूट दरीत ढकलून देत हत्या केली होती. या घटनेमुळे पुण्यासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या हायप्रोफाईल प्रकरणात आता पोलीस चौकशीदरम्यान सातत्याने नवीन माहिती समोर येत आहे.
सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्याशी लग्न करायचे नव्हते. तिचे चेतन चौधरी या तरुणांशी प्रेमसंबंध असल्याचंही स्पष्ट झालं आहे. सिया आणि केतन यांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी तयारी केली होती. मात्र, सियाला केतन हा मनापासून कधीच पसंत पडला नाही. त्याचमुळे तिनं आणि प्रियकर चेतननं केतनचा काटा काढल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.


COMMENTS