नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी काय जाहीर केली लगेच "पवार बुद्धीच्या" पत्रकारांनी राष्ट्रवा...
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी काय जाहीर केली लगेच "पवार बुद्धीच्या" पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार नावाचे पर्व सुरू झाले, असे ढोल पिटले.
जणू काही पार्थ पवार यांनी रेटून उमेदवारी दिलेली विक्रम काकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार मोठी क्रांती घडवून राज्यात भूकंप आणतायत की काय, असे चित्र "पवार बुद्धीच्या" पत्रकारांनी निर्माण केले. पण प्रत्यक्षात पुण्यात सुरू झालेले हे पार्थ पवार पर्व हे वजाबाकीतून पक्ष संघटनेची वाताहात झाल्याचेच खरे वर्म ठरले.
कारण अजित पवार हयात असते तर राष्ट्रवादी काँग्रेसला कशाबशा मिळालेल्या दोन जागांवर उमेदवार ठरविताना एवढी डोकेफोड करावीच लागली नसती. बैठकांचे सिलसिले घ्यावेच लागले नसते. अजित पवारांनी एका झटक्यात पुणे आणि रायगड मधले उमेदवार जाहीर करून सगळ्यांना कामाला लावून टाकले असते.
- पुण्यात बंद आहे
पण अजित पवार नसल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती गोची झाली आणि सुनेत्रा पवारांना आपल्या मुलाचे नेतृत्व पक्षात प्रस्थापित करण्यासाठी फार मोठी धडपड करावी लागली. पण ही धडपड सुद्धा त्यांच्या फारशी कामी आली नाही कारण सुनेत्रा पवारांना खऱ्या अर्थाने पार्थ पवारांचे नेतृत्व प्रस्थापितच करता आले नाही. पार्थ पवारांनी रेटून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली तरी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हा निर्णय पटला नाही म्हणून सुनील टिंगरे यांनी थेट बंडखोरी केली. पक्षाच्या अनेक नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून दाखविली. सुनील टिंगरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी तर पक्षाने केवळ आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला. त्यामुळे विक्रम काकडे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने पार्थ पवारांचे नेतृत्व प्रस्थापित करायचा सुनेत्रा पवारांचा "डाव" फसला.
- पुण्यावरची पकड निसटली
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसची वीण ढिल्ली पडली. भाजपने सुनेत्रा पवारांना आधार देऊन त्यांना उपमुख्यमंत्री पदासारखे मोठे पद देऊन सुद्धा पक्षावर पुरती पकड ठेवता आली नाही. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कुठे फिरता आले नाही. उलट त्यांनी घाईगर्दी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवारचे नेतृत्व प्रस्थापित करायचा किंबहुना लादायचा प्रयत्न केला. पण त्याचा परिणाम उलटा झाला. पक्षातली नाराजी जाहीरपणे उफाळून आली आणि त्यामध्ये अगदी पुण्यातल्या स्थानिक राजकारणाची सुद्धा मोठी भर पडली. पुण्यातल्या जिल्हा परिषदांमधल्या पदांच्या वाटपात ही नाराजी उघड दिसली. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षातले जुने जाणते नेते आणि कार्यकर्ते बरेच दुखावून ठेवले. त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले.
- राष्ट्रवादीची अर्थव्यवस्था ढासळली
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर पक्षाची अर्थव्यवस्था सुद्धा ढासळल्याची चिन्हे दिसली. भले पार्थ पवारांनी पक्षाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही निर्णय घ्यावे असे सुचविले असले तरी त्यांची सुचविण्याची पद्धत पक्षातल्या छगन भुजबळांच्या सारख्या नेत्यांना बिलकुल पसंत पडली नाही. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना दुखवून पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसची अर्थव्यवस्था सुधारू शकतील याची बिलकुल शक्यता नाही आणि तशी त्यांनी सुधारली तरी पक्ष संघटना त्यांच्या ताब्यात राहील याची कुठलीही गॅरंटी नाही कारण पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवारांचे नेतृत्व हे अजित पवारांसारखे राष्ट्रवादीतल्या "सिमेंटिंग फोर्स" नाहीत. ते तसे असते तर मुळात राष्ट्रवादी काँग्रेसची अर्थव्यवस्था त्यांनी ढासळू दिली नसती. पण ज्या अर्थी ती अर्थव्यवस्था ढासळली आणि ती सुद्धा सुनेत्रा पवारांच्या हातात पक्षाचे अध्यक्ष पद आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पद असताना ढासळली, याचा अर्थच सुनेत्रा पवारांचे नेतृत्व राजकीय दृष्ट्या कमी पडले किंवा तेवढे सक्षम राहिले नाही, ही बाब सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड झाली.
- पार्थ बद्दल पवारांचे मूल्यांकन खरे
शरद पवारांनी पार्थ पवारांचे मूल्यांकन करताना त्यांना अपरिपक्व म्हटले होते याचा अर्थच त्यातला इशारा पार्थ पवारांना समजायला हवा होता, पण तो समजल्याची कुठली चिन्हे त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीस दिसली नाहीत. अन्यथा विक्रम काकडे यांची उमेदवारी निश्चित करताना त्यांनी आधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले असते. त्यांची व्यवस्थित समजूत काढली असती आणि नंतरच विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर केली असती, पण ज्याअर्थी विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी बंडखोरीची भाषा वापरली, त्याअर्थी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे आपली संघटनेवरची राजकीय पकड पक्की करू शकले नसल्याचीच ती उदाहरणे ठरली.


COMMENTS