Crime News : एका 26 वर्षीय सहाय्यक शाखा पोस्टमास्तरने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घ...
Crime News : एका 26 वर्षीय सहाय्यक शाखा पोस्टमास्तरने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखिल वर्मा असे मृत तरुणाचे नाव असून, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तीन पानांची सुसाईड नोट लिहिली आहे.या चिठ्ठीमध्ये त्याने टपाल विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वारंवार मानसिक छळ केल्याचा आणि पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. माझ्या मृत्यूनंतर दोषींना शिक्षा होईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नका, अशी आर्त हाकही त्याने या चिठ्ठीत आपल्या कुटुंबीयांना दिली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील ही घटना आहे.
'मी मानसिकदृष्ट्या खचलोय...'
निखिलने त्याच्या घराजवळील शेतात असलेल्या एका छोट्या खोलीत गळफास लावून आपले जीवन संपवले. बराच वेळ तो न दिसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला, तसेच त्याच्या खिशातील सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्या पालकांची माफी मागत आपली व्यथा मांडली होती. 'मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलो आहे. पोस्टल अधीक्षक माझ्याकडे पैशांची मागणी करत असून, पैसे न दिल्यास नोकरी करू देणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. माझ्या मृत्यूला मेल ओव्हरसीअर आणि पोस्टल अधीक्षक जबाबदार आहेत,' असे निखिलने चिठ्ठीत नमूद केले आहे.
सुट्ट्या मंजूर करायच्या असल्यास...
निखिलचे वडील धर्मेंद्र यांनी याप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल हा जिल्ह्यातील मुदई उप-टपाल कार्यालयात कार्यरत होता. सुट्ट्या मंजूर करण्यासाठी तेथील मेल ओव्हरसीअर त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. या पैशांमध्ये पोस्टल अधीक्षकांचाही वाटा असतो, असे सांगून निखिलला धमकावले जात होते. पैसे न दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची भीती सतत दाखवली जात असल्याने निखिल गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता, असे त्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
कुटुंबियांचे आंदोलन
याप्रकरणी पोलिसांनी पोस्टल अधीक्षक सुशील कुमार यांच्यासह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच आरोपी अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी निखिलच्या कुटुंबीयांनी मृतदेहासह तब्बल 10 तास धरणे आंदोलन केले. अखेर पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यास संमती दिली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी अधिकारी सध्या फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.


COMMENTS