पिंपरी : हातात नोकरीचे नियुक्तीपत्र आणि डोळ्यांत उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन हिंजवडीत दाखल झालेल्या सातशेहून अधिक तरुण-तरुणींना एका रा...
पिंपरी : हातात नोकरीचे नियुक्तीपत्र आणि डोळ्यांत उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन हिंजवडीत दाखल झालेल्या सातशेहून अधिक तरुण-तरुणींना एका रात्रीत बेरोजगार केले आहे. थिंक टेक्नॉलॉजी इंडिया या आयटी कंपनीने अचानक टाळेबंदी करत कर्मचाऱ्यांचे पगार, इंटर्न्सची डिपॉझिट रक्कम आणि भविष्यच अंधारात ढकलल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी पोलिस व कामगार विभागाकडे धाव घेतली आहे.
हिंजवडी फेज-२ मधील गेराज इम्पेरियम राईज इमारतीतून ही कंपनी कार्यरत होती. गेल्या काही महिन्यांत कंपनीने मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केली होती. सुरुवातीला इंटर्न्सना वेळेवर १५ हजार रुपये मानधन देऊन विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडू लागले. याबाबत विचारणा केल्यावर कंपनीचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे आणि एचआर विभागाने इंटरनल ऑडिट सुरू असल्याचे कारण देत दि. २५ ते दि. २८ फेब्रुवारीदरम्यान सर्व थकीत रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा दबाव वाढल्यानंतर व्यवस्थापनाने पगाराचे धनादेश दिले. मात्र, हे सर्व धनादेश वटले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
तसेच कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक टाळेबंदी केली. त्यामुळे एका रात्रीत सातशेहून अधिक सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, फ्रेशर्स आणि इंटर्न्स बेरोजगार झाले. आता त्यांच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण झाली असून, रखडलेल्या पगारामुळे घरखर्च, घरभाडे आणि कर्जाचे हप्ते भरण्याचे मोठे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. यातील बहुतांश कमर्चारी हे पुण्याबाहेरील आहेत.
थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रकरणात सातशेहून अधिक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. फ्रेशर्सकडून लॅपटॉप व नोकरीच्या नावाखाली पैसे घेऊनही पगार आणि ठेव रक्कम न दिल्याचे आरोप होत आहेत. आयटी क्षेत्रातील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कामगार विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवावी. दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून कर्मचाऱ्यांचे हित जपणे आवश्यक आहे. - प्रशांत पंडित, सरचिटणीस, फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज.
थिंक टेक्नॉलॉजी कंपनीच्या एचआर विभागाने मला १५ हजार रुपयांचा धनादेश दिला. तो बॅंकेत जमा केला असता वटला नाही. कंपनीचा मालक गायब झाला असून याबाबत माहिती असतानाही एचआर विभागातील अधिकारी मूग गिळून गप्प बसले. माझे चार महिन्यांचे नुकसान झाले. पोलिसांत तक्रार केली. तथापि काहीच कारवाई होत नाही. - एक आयटी कर्मचारी, हिंजवडी.


COMMENTS