पंढरपूर : तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील विहीर दुर्घटनेनंतर म्हसवड- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे ...
पंढरपूर : तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील विहीर दुर्घटनेनंतर म्हसवड- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत.एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही 2023 मध्ये काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब पोलिस तपासामध्ये समोर आली आहे.
या नंतर पोलिसांनी राज्य रस्ते विकास मंडळाच्या पुणे येथील कार्यकारी अभियंता दिपाली पोतदार यांना सहआरोपी केले असून त्यांची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेला जबाबदार असलेला मुख्य आरोपी नवज्योत गडोख (रा. पुणे) हा मात्र अजूनही मोकाट फिरत आहे. मुख्य आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
तांदुळवाडी येथे 14 जून रोजी महामार्गा लगत असलेल्या विहिरीत टेम्पो कोसळून अपघात झाला होता. यामध्ये पंढरपूर येथील बावचे आणि सातोरे कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विहिरीला संरक्षित कठडे नसल्यामुळे अपघात झाल्याचा ठपका ठेवून रस्ते बांधकाम ठेकेदार नवज्योत गडोख व महामार्गाची देखलभाल करणाऱ्या विरुध्द वेळापूर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रोडवेज सेल्यूशन कंपनीकडे काम करणाऱ्या तांदुळवाडी येथील वैभव जरे याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी नवज्योत गडोख हा अजूनही मोकाट असल्याने मृतांच्या नातेवाईकांमधून पोलिसांच्या तपास विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, म्हसवड ते पंढरपूर या 60 किलोमीटर रस्त्याचे काम 2023 मध्येच पूर्ण झाले असा दाखला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासामध्ये पुढे आल्यानंतर कार्यकारी अभियंता दिपाली पोतदारसह आणखी एका अभियंत्यालासह आरोपी केले आहे. या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी दिली आहे.
मुख्य आरोपीची साधी चौकशीही नाही
येथील दुर्घटनेतील मुख्य आरोपी नवज्योत गडोख याच्यावर पोलिसांनी सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतरही मुख्य आरोपीची साधी चौकशीही करण्यात आली नाही. केवळ स्थानिक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीचे राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्याला अटक तर सोडा त्याची साधी चौकशीही करण्यात आली नाही, असा आक्षेप मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
तांदुळवाडी दुर्घटनेप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह इतर लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासमध्ये एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी 2023 मध्ये काम पूर्ण झाल्याचा दाखल दिल्याचे समोर आले आहे. याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांकडून पडताळणी सुरु आहे. याप्रकरणी एमएसआरडीसीच्या दिपाली पोतदार यांना सहआरोपी करण्यात आले आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.
तांदुळवाडी दुर्घटनेला रस्ते ठेकेदार नवज्योत गडोख हा जबाबदार आहे. त्याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता दोन दिवसात अटक करावी, अन्यथा मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल. त्यापूर्वीच पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करावी. रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकार्याची नियुक्ती करावी.


COMMENTS