उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 मजुरांना वेठबिगारीवर ठेऊन त्यांचा अमानुष छळ केला जात होता.प्रशासनाने केलेल्या कारवाईमु...
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 मजुरांना वेठबिगारीवर ठेऊन त्यांचा अमानुष छळ केला जात होता.प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे या मजुरांची अमानवी छळातून सुटका झाली आहे.
मुझफ्फरनगर जिल्ह्यात हा प्रकार घडला. जिल्ह्यातील मांडी गावात पानांपासून बनवल्या जाणाऱ्या पत्रावळी, द्रोण (दोना) बनवणाऱ्या एका कारखान्यातून या 12 जणांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आली आहे.
पोलीस आणि कामगार (श्रम) विभागाने ही संयुक्त मोहीम राबवली होती. या कारवाईमुळे मुक्त झालेल्या या मजुरांनी सांगितलं की, त्यांना कैद्यांसारखं ठेवलं जात होतं. त्यांचे मोबाइल काढून घेतले होते, ओळखपत्रं जाळण्यात आली होती आणि त्यांना बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली होती.
सुटका करण्यात आलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड, हरियाणा, राजस्थान आणि अगदी नेपाळमधील लोकांचाही समावेश आहे.
Varun Kumar/Mohammad Suhailपोलीस आणि कामगार (श्रम) विभागाने संयुक्त कारवाई करत मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुटका केली.
मुझफ्फरनगरचे एसएसपी संजय वर्मा यांनी सांगितलं की, काही मजुरांच्या बरगड्या तुटल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या गंभीर जखमा दाखवल्या आहेत. तसेच, छळामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर कारखान्याचा मालक अंकित बालियानचा पोलीस शोध घेत आहेत.
बीबीसीने संशयित आरोपी अंकित बालियान याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा फोन बंद होता. इतर दोन आरोपींच्या कुटुंबीयांशीही संपर्क होऊ शकलेला नाही.
बीबीसी न्यूज हिंदीने या मजुरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगितली.
पोलिसांनी या प्रकरणाबद्दल काय म्हटलं?
22 जून रोजी मुझफ्फरनगरमधील तितावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडी गावात पोलीस, प्रशासन आणि कामगार विभागाच्या पथकाने छापा टाकून 12 मजुरांची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, या लोकांना जबरदस्तीने द्रोण बनवणाऱ्या एका कारखान्यात डांबून ठेवण्यात आलं होतं., "कारखान्यात मजुरांना अतिशय अमानूष वागणूक दिली जात होती. त्यांना तापवलेल्या लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली जात होती."
"अनेक मजुरांच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे सांगितलं जात आहे. हे सर्व मजूर बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, हरियाणा आणि राजस्थानसह विविध राज्यांतील रहिवासी आहेत."
Varun Kumar/Mohammad Suhailपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात मजुरांना अतिशय अमानुष आणि जनावरांसारखी वागणूक दिली जात होती.
मुझफ्फरनगरचे एसएसपी संजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "आम्हाला माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि कामगार विभागाने संयुक्तपणे कारखान्यावर छापा टाकला. तेथून 12 मजुरांची सुटका करण्यात आली. सर्वांवर अत्याचार करण्यात आले होते."
"काही जणांच्या कानाला दुखापत झाली होती, काहींच्या कंबरेवर गंभीर जखमा होत्या, तर एका मजुराच्या बरगड्याही मोडल्या होत्या. यापैकी काही जणांना दोन वर्षांपासून, तर काहींना अनेक महिन्यांपासून डांबून ठेवण्यात आलं होतं."
ते म्हणाले की, "आरोपींनी केलेल्या अत्याचारामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. त्यापैकी एका व्यक्तीची ओळख पटली असून पुढील कारवाई सुरू आहे."
"या प्रकरणात शिवा त्यागी (बुढाना, मुझफ्फरनगर) आणि प्रदीप बालियान (तितावी, मुझफ्फरनगर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर याच गावातील रहिवासी असलेला अंकित बालियान फरार आहे."
या प्रकरणात आरोपींविरुद्ध बालमजूर (प्रतिबंध व नियमन) कायदा, 1986; बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, 2015 मधील कलम 75 व 79; आणि वेठबिगारी पद्धती (उच्चाटन) कायदा, 1976 मधील कलम 16, 17 व 18 यांसह विविध तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Varun Kumar/Mohammad Suhailसुटका करण्यात आलेला मजूर सोनू चौहान
मजुरांनी सांगितली आपली व्यथा
बीबीसीने तिथून सुटका केलेल्या मजुरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली.
उत्तराखंडमधील नैनिताल येथे राहणाऱ्या रामूने म्हटलं की, "आम्हाला कारखान्यात कैद्यांसारखं ठेवलं होतं. गेटच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आमचे मोबाइल काढून घेतले होते आणि आधार कार्डही जाळून टाकले होते. लोखंडी रॉडने मारहाण केली जात असत, खायला फक्त जाड कोंड्याची भाकरी देत होते."
तो म्हणाला, "आमच्याकडून अनेक तास सलग काम करून घेतलं जात होतं. झोपूही दिलं जात नव्हतं. कारखान्याचा मालक अंकितने आम्हाला येथे आणलं होतं. पोलिसांमुळे आम्हाला नवीन जीवन मिळालं आहे."
20 वर्षीय रामूचे आई-वडील हयात नाहीत. साधारण अडीच महिन्यांपूर्वी त्याला मजुरीचे काम देण्याचं आमिष दाखवून अंबाला रोडवेज स्थानकावरून मुझफ्फरनगर येथे आणण्यात आलं होतं. त्याला तीन भाऊ-बहिणी आहेत.
BBC
उत्तर प्रदेशातील औरैयाचा रहिवासी असलेला 26 वर्षीय शिवम कुमारचीही या मोहिमेत सुटका करण्यात आली. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. त्याच्या कुटुंबात दोन बहिणी आहेत.
गेल्या 6 महिन्यांपासून त्याला कारखान्यात जबरदस्तीने ठेवण्यात आलं होतं. त्याने प्रसारमाध्यमांना आपल्या कंबरेवरील आणि छातीवरील गंभीर जखमांच्या खुणा दाखवल्या.
उत्तर प्रदेशमधील सीतापूरचे रहिवासी असलेले 50 वर्षीय जगदीश यांना आपबिती सांगताना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, "आम्हाला येथे येऊन 11 महिने झाले आहेत. घरी जायचं आहे किंवा येथे मन लागत नाही असं म्हटलं की, आम्हाला बेदम मारहाण केली जात असत."
छत्तीसगडमधील बिलासपूरचे रहिवासी नाराय कारखान्यातून सुटका झाल्यानंतर खूप आनंदी दिसत होते. ते वारंवार पोलिसांचे आभार मानत होते.
ते म्हणाले, "माझ्या घरात दोन भाऊ आणि दोन मुले आहेत. मजुरीचे काम देण्याचे सांगून मला जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावरून मुझफ्फरनगर येथे आणलं होतं. मी येथे सुमारे 4 महिन्यांपासून होतो. मला माझ्या कुटुंबीयांची खूप आठवण यायची."
Varun Kumar/Mohammad Suhailमजुरांनी माध्यमांना त्यांच्या जखमा दाखवल्या.
या वेठबिगारी मजुरांमध्ये नेपाळच्या पाल्पा जिल्ह्यातील सत्यवती गावचे रहिवासी दानबहादूर थापा यांचाही समावेश आहे. दानबहादूर यांनी सांगितलं की, त्यांना सुमारे दोन वर्षांपासून या कारखान्यात डांबून ठेवण्यात आलं होतं. या काळात त्यांना एकदाही कुटुंबीयांशी बोलता आलं नाही.
ते म्हणाले, "आमच्याकडून सतत शारीरिक कष्टाची कामं करून घेतली जात होती. खायला फक्त कोंड्याच्या पिठाची भाकरी, सोबत मीठ आणि लाल तिखट दिले जायचे. चहामध्ये साखरही नसायची."
Varun Kumar/Mohammad Suhailसुटका करण्यात आलेल्या वेठबिगारी मजुरांमध्ये नेपाळचे रहिवासी दानबहादूर थापा यांचाही समावेश आहे.
'मजूर पळून जाऊ नयेत म्हणून पिटबुल कुत्र्याचा पहारा'
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, आरोपी मजुरांना रेल्वे आणि बस स्थानकांवरून कामाचं आमिष दाखवून आणत असत. त्यांना दरमहा 10 ते 12 हजार रुपये पगार, तसेच राहण्याची आणि जेवणाची सोय करण्याचे आश्वासन दिले जात. परंतु, कारखान्यावर पोहोचल्यानंतर त्यांना ना पगार दिला जात, ना चांगलं अन्न.
मुझफ्फरनगरमधील ज्या कारखान्यातून मजुरांची सुटका करण्यात आली, तेथून पोलिसांनी पिटबुल जातीचा एक कुत्राही जप्त केला आहे. तितावी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रमोद कुमार यांनी सांगितलं की, मजूर पळून जाऊ नयेत म्हणून हा कुत्रा बाहेर पहारा देण्यासाठी ठेवण्यात आला होता.
आरोपींनी मजुरांचे मोबाइल काढून घेतले होते. त्यामुळे या मजुरांचा अनेक महिन्यांपासून आपल्या कुटबीयांशी संपर्क झाला नव्हता, हे पोलीस तपासातून समोर आलं.
Varun Kumar/Mohammad Suhailमजुरांना लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठ्यांनी निर्दयीपणे मारहाण केली जात होती, असं पोलिसांनी सांगितलं.
तितावी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रमोद कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, "सध्या मजुरांची सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. काहींचे नातेवाईक आधीच पोहोचले आहेत, तर अनेक जण अजून यायचे आहेत."
ते पुढे म्हणाले, "मजुरांना कारखान्यात डांबून ठेवलं होतं आणि त्यांचे मोबाइलही काढून घेतले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधता आला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती की नाही, याची आता चौकशी केली जात आहे."
ग्रामस्थ काय म्हणतात?
हे प्रकरण उघडकीस आल्यापासून फरार आरोपीच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही. गावकऱ्यांना आरोपीबाबत विचारलं असता, बहुतांश जण यावर बोलणं टाळताना दिसले.
बीबीसीने आरोपी अंकित बालियानला मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा फोन बंद होता.
Varun Kumar/Mohammad Suhailद्रोण बनवण्याचा हा कारखाना गावाच्या बाहेरील भागात असून तो मोठ्या भागात पसरलेला आहे.
द्रोण तयार करण्याचा हा कारखाना मांडी गावाच्या बाहेरील भागात मोठ्या परिसरात पसरलेला आहे. गावाचे माजी सरपंच बिजेंद्र यांनी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना म्हटलं की, "याठिकाणी असं काही सुरू आहे याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. फक्त इतकंच माहीत होतं की, तिथे कशाचा तरी कारखाना आहे."
"आम्हाला थोडा संशय होता, पण इतकं काही सुरू आहे, याची माहिती नव्हती," असं एका ग्रामस्थाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं.


COMMENTS