आजचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ मनोरंजनाचे साधन उरले नसून, ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण मिळवत आहेत. आर्टिफिशियल इंटेलि...
आजचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ मनोरंजनाचे साधन उरले नसून, ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण मिळवत आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे आपल्याला हव्या त्याच गोष्टी सतत दाखवल्या जात असल्याचे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सोशल मीडियाच्या अति वापरावर काय उपयोजना करता येतील याबाबत भाष्य केलं आहे.
जगाप्रमाणे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान, अभिनेता आमिर खानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्य अशा प्रकारच्या बंदी बाबत काही विचार करत आहे का असा प्रश्न केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य करताना यावर काहीतरी ठोस आणि अंतिम विचार करावा लागेल असं म्हटलं आहे.
"माझेही वाचन कमी झाले आहे"
"सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे एआय अल्गोरिदमद्वारे ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी सतत दाखवतात. यामुळे हळूहळू तुमची विचारप्रक्रिया त्याच साच्यात तयार होऊ लागते. याचा दुसरा मोठा तोटा म्हणजे आपली एकाग्रतेची क्षमता कमी झाली आहे. अवघ्या ३० सेकंदांच्या रील्समुळे आता कोणालाही सविस्तर किंवा मोठी गोष्ट पाहण्यात रस राहिलेला नाही. मी स्वतः एकेकाळी खूप वाचन करायचो, पण आता माझेही वाचन कमी झाले आहे. हे खरंच एक गंभीर आव्हान आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
"आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या असा विचार सुरू आहे की, १६-१७ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी आणावी. या विषयावर आपल्याला काहीतरी ठोस आणि अंतिम विचार करावा लागेल. आज मी इतकेच सांगेन की, सोशल मीडियावर बंदी येणार की नाही, हे मी आताच स्पष्ट करत नाही. परंतु सोळा वर्षांखालील मुलांवर जो त्याचा विपरीत परिणाम होत आहे, तो कसा थांबवता येईल यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करेल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


COMMENTS