एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साहिल असे मृताचे नाव असून वाढदिवसाच्या प...
एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साहिल असे मृताचे नाव असून वाढदिवसाच्या पार्टीला जातोय असं सांगून तो घराबाहेर पडला होता.
मात्र प्रत्यक्षात तो त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी प्रेयसीच्या नातेवाईकांनी मारहाण करत त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा परिसरातील ही घटना आहे.
तलावाच्या काठी आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (25 मार्च) सकाळी एका तलावाच्या काठी साहिलचा मृतदेह आढळून आला होता. मृत साहिलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चक्रं फिरवली. साहिलच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स तपासले असता, त्याचे रामशंकर नावाच्या व्यक्तीच्या पत्नीशी बोलणे झाल्याचे स्पष्ट झाले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयावरून रामशंकरला ताब्यात घेतले असता संपूर्ण कट उघडकीस आला.
घरी बोलावून केली हत्या
आरोपी रामशंकरने चौकशीत कबूल केले की, त्याचे लग्न 13 मार्च रोजी एका सामूहिक विवाह सोहळ्यात झाले होते. लग्नानंतरही त्याची पत्नी साहिलशी फोनवर बोलत असे. या रागातून रामशंकरने साहिलला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्याने मुंबईत काम करणारा त्याचा चुलत भाऊ रामबाबू, तसेच गावातील दिनेश आणि रमण उर्फ अंगद यांची मदत घेतली. मंगळवारी (24 मार्च) रात्री साहिलला बोलावून घेऊन या चौघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली.
आरोपींची रवानगी तुरुंगात
गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी साहिलचा मृतदेह आणि त्याची दुचाकी गावातील तलावाच्या परिसरात फेकून दिली होती. पोलिसांनी आरोपी रामशंकरसह दिनेश, रामबाबू आणि रमण यांना अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


COMMENTS