बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात हत्येची एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. भुसारी नावाच्या गावात एका तरुणाचा शिर नसलेल...
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात हत्येची एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. भुसारी नावाच्या गावात एका तरुणाचा शिर नसलेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सुधांशू कुमार उर्फ शर्माजी असे या मृत तरुणाचे नाव असून तो याच गावचा रहिवासी होता. या अमानुष कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी धड ताब्यात घेऊन कापलेल्या शिराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पोत्यात सापडला शिर नसलेला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, सुधांशू कुमार मंगळवारी (10 मार्च) रात्री 8 वाजल्यापासून बेपत्ता होता. वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सुधांशू ज्या रात्री बेपत्ता झाला त्या रात्री काही लोकांनी त्याला खाण्यापिण्याच्या बहाण्याने बोलावून नेले होते असेही नातेवाईकांनी सांगितले आहे. सुधांशूला फसवून सोबत नेल्यानंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (12 मार्च) गावाजवळील मातीत गाडलेल्या एका पोत्यात त्याचा शिर नसलेला मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. ही घटना समोर येताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
गावात पोलिस बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. पुराव्यांच्या संकलनासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून हत्येशी संबंधित महत्त्वाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. मृत तरुणाचे शिर अद्याप सापडलेले नसल्याने पोलीस आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवत आहेत. या घटनेमुळे भुसारी गावातील नागरिक संतप्त असून कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तपासानंतरच सगळं स्पष्ट होईल
पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हा प्रकार आपसातील वादातून घडल्याचे दिसून येत आहे, मात्र सखोल तपासानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल. संशयित आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु असून या गुन्ह्यातील दोषींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. सध्या मृतदेह पोस्ट मार्टमससाठी पाठवण्यात आला असून सबंध गावावर शोककळा पसरली आहे.


COMMENTS