बारामती: प्रेमसंबंधातून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील रुई ...
बारामती: प्रेमसंबंधातून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील रुई बयाजीनगर येथे राहणाऱ्या युवकाने गळफास घेतला आहे.
विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, ता. बारामती) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम कोळपे यांचे मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन जणांविरोधात (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम आणि एका युवतीमध्ये मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. फिर्यादीनुसार, सुरुवातीला युवतीने लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे सांगत तिने लग्नास नकार दिला. २७ डिसेंबर २०२५ पासून युवती आणि तिची बहीण यांनी विक्रमला वारंवार फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेल करणे सुरू केल्याचा आरोप आहे. विक्रमला पुणे येथे बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आल्याचे आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. युवतीच्या वडिलांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७.४५ वाजण्याच्या सुमारास विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, "आई मला माफ कर. मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे," असा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिठ्ठीत संबंधित व्यक्तींनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख केल्याचेही समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत आहेत.


COMMENTS