राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बडौदा मेव कस्बा आज एका अनोख्या आणि धक्कादायक विवाहामुळे चर्चेत आला आहे. हत्येच्या गुन्ह्यात आजीवन कारावासाची...
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बडौदा मेव कस्बा आज एका अनोख्या आणि धक्कादायक विवाहामुळे चर्चेत आला आहे.
हत्येच्या गुन्ह्यात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेली प्रिया सेठ आणि हनुमान प्रसाद हे दोघेही आज विवाहबंधनात अडकले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोघांनाही लग्नासाठी पॅरोल मंजूर करण्यात आली होती. विशेष म्हणजे, दोघेही वेगवेगळ्या खून प्रकरणांत दोषी ठरलेले कैदी आहेत.
सध्या प्रिया सेठ 33 वर्षांची तर हनुमान प्रसाद 32 वर्षांचा आहे. जयपूरच्या ओपन जेलमध्ये शिक्षा भोगत असताना दोघांची ओळख झाली, जवळीक वाढली आणि मागील सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. आज, 23 जानेवारी रोजी, पॅरोलवर सुटलेले हे दोघे विवाहबंधनात अडकले असून या घटनेने संपूर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे.
प्रिया सेठचं गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?
पाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रिया सेठ हिने आपल्या प्रियकर दीक्षांत कामराचे कर्ज फेडण्यासाठी झोटवाडा (जयपूर) येथील दुष्यंत शर्मा याला डेटिंग अॅपच्या माध्यमातून प्रेमजाळ्यात अडकवले होते. सखोल तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 2 मे 2018 रोजी प्रिया हिने दुष्यंतला भेटीसाठी बोलावून बजाज नगरमधील फ्लॅटवर नेले. तेथे आधीच तिचा प्रियकर दीक्षांत कामरा आणि त्याचा मित्र लक्ष्य वालिया थांबले होते. कटानुसार तिघांनी दुष्यंतला डांबून ठेवत त्याच्या वडिलांकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. दुष्यंतच्या वडिलांनी भीतीपोटी तीन लाख रुपये त्याच्या खात्यात जमा केले. मात्र, सुटका केल्यास पकडले जाण्याच्या भीतीने तिघांनी दुष्यंतचा गळा आवळून खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला आणि मृतदेह सूटकेसमध्ये भरून आमेरच्या टेकड्यांमध्ये फेकून देण्यात आला.दुष्यंतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर आमेर पोलीस ठाण्याने 3 मे 2018 रोजी मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपासात 4 मे रोजी प्रिया सेठ, दीक्षांत कामरा आणि लक्ष्य वालिया यांना अटक करण्यात आली.
प्रिया सेठ कोण आहे?
प्रिया सेठ ही सुशिक्षित कुटुंबातून आलेली आहे. तिचे आजोबा प्राचार्य, वडील महाविद्यालयीन प्राध्यापक तर आई शासकीय शाळेत शिक्षिका होती. दहावी-बारावीत चांगले गुण मिळाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिला जयपूरला पाठवण्यात आले. मात्र, तेथूनच तिच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. जयपूरमध्ये नातेवाइकांकडे राहत असताना ती चुकीच्या संगतीत अडकली आणि पुढे पेइंग गेस्टमध्ये राहू लागली. महागडे शौक पूर्ण करण्यासाठी तिने तरुणांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आणि एक वेबसाइट तयार करून पैसे उकळू लागली. याच काळात तिची ओळख श्रीगंगानगरचा रहिवासी आणि मुंबईत मॉडेलिंग करणारा दीक्षांत कामरा याच्याशी झाली. दोघे जयपूरमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दरम्यान, दुष्यंत शर्माची ओळखही प्रिया सेठशी डेटिंग अॅपद्वारे झाली होती. त्याने स्वतःला दिल्लीचा रहिवासी आणि करोडपती असल्याचे सांगितले होते. यामुळे प्रभावित होऊन प्रियाने मोठी रक्कम उकळण्याचा कट रचला आणि त्यात दीक्षांत व लक्ष्य वालियालाही सामील केले. अखेर या कटाचा शेवट दुष्यंतच्या हत्येत झाला. 24 मे 2024 रोजी जयपूरच्या न्यायालयाने प्रिया सेठ, दीक्षांत कामरा आणि लक्ष्य वालिया यांना दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. लक्ष्य वालियाचे वडील निधन पावले असून तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा आहे.
हनुमान प्रसाद पाच जणांच्या हत्या प्रकरणात भोगतोय शिक्षा
दरम्यान, नवरा हनुमान प्रसाद याचाही गुन्हेगारी इतिहास तितकाच गंभीर आहे. 2 ऑक्टोबर 2017 रोजी त्याने पाच जणांच्या हत्येचा केली होती. माहितीनुसार या प्रकरणात एका महिलेसोबत झालेल्या वादातून त्याने कट रचला आणि एका कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातही न्यायालयाने हनुमान प्रसादला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गुन्ह्यानंतर हनुमान उदयपूरकडे पळून गेला होता, मात्र दोन दिवसांत पोलिसांनी त्याला अटक केली.


COMMENTS