ताडेपल्ली (आंध्र प्रदेश) : प्रेमविवाह केलेल्या आणि हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असलेल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्य...
ताडेपल्ली (आंध्र प्रदेश) : प्रेमविवाह केलेल्या आणि हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असलेल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुंटूर जिल्ह्यात घडली आहे.
माधुरी साहित्यीबाई (वय २५) असे तिचे नाव आहे. नांद्याल जिल्ह्यातील बुग्गनपल्ली येथील राजेश नायडू सोबत ५ मार्च रोजी तिने विवाह केला होता.
प्रेमविवाहानंतर काही दिवसांमध्येच तिने तिच्या पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. सप्टेंबरमध्ये तिचे पालक तिला घरी घेऊन आले. रविवारी ती बाथरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी हुंडाबळी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. माधुरी गेल्या काही महिन्यांपासून तिच्या पालकांसोबत राहत होती. बराच वेळ बाथरूममधून बाहेर आली नव्हती. जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा त्यांनी तो तोडून आत पाहिले तर ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. माधुरीने काही महिन्यांपूर्वी तिचा पती राजेश नायडूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी आणि राजेश हे नांद्याल जिल्ह्यातील बीतंचर्ला मंडळातील बुग्गनपल्ली या एकाच गावातील रहिवासी होते. दोघे प्रेमासंबंध होते. या काळात, माधुरीने बॅकलॉगमुळे तिचे बी.टेक.चे शिक्षणही अर्धवट सोडले. दोघांनी ५ मार्च रोजी लग्न केले आणि ७ मार्च रोजी त्यांच्या कुटुंबियांना कळवले. नंतर लग्नाची नोंदणी करण्यात आली. मात्र काही महिन्यांनंतर, माधुरीने तिच्या पालकांना फोन करून सांगितले की तिला हुंड्यासाठी छळ होत आहे. त्यानंतर कुटुंबाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिला घरी आणले. तेव्हापासून ती तिच्या पालकांसोबत राहत होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि तपास सुरू आहे.
राजेश पोलिसांकडे पोहोचला आणि त्याने माधुरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारी एक याचिका सादर केली. त्याच्या याचिकेनुसार तिचे पालक दोघांच्या लग्नाला मान्यता देत नव्हते. त्यांनी तिला जबरदस्तीने माहेरी आणले होते.”तिने मला अनेक मेसेज पाठवून आपली व्यथा सांगितली. तिला तिच्या कुटुंबाकडून मानसिक त्रास दिला जात होता. मला सोडून देऊन दुसऱ्या लग्नाला तयार होण्यास दबाव टाकला जात होता. या सततच्या दबावामुळे ती अत्यंत असुरक्षित मनस्थितीत गेली होती. माधुरी गर्भवती होती. तिच्या पोटात मूल वाढवत आहे याचाही त्यांनी विचार केला नाही. ही आत्महत्या नाही, हा खून आहे. ते प्रकरणाला वळसा घालण्यासाठी आपल्या पदाचा वापर करत आहेत” असा आरोप त्याने केला आणि निष्पक्ष चौकशीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


COMMENTS