कोल्हापूर : कोल्हापुरात बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. बेदरकारपणे गाडी चालवल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार...
कोल्हापूर : कोल्हापुरात बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. बेदरकारपणे गाडी चालवल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल चौकात भीषण अपघात घडला आहे.
थंडीपासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला शेकोटी करत उभ्या असलेल्या तिघांना भरधाव इनोव्हा कारने चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तावडे हॉटेल चौक हा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीचा परिसर आहे. पहाटेच्या वेळेत वाहतूक तुलनेने कमी असली तरी, भरधाव जाणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे वारंवार दिसून येते. मंगळवारी पहाटे काही जण थंडीमुळे रस्त्याच्या बाजूला थांबून शेकोटी करत होते. याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अन् त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना चिरडलं.
अपघाताची तीव्रता इतकी होती की, तिघेही जण कारच्या धडकेत दूर फेकले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काहींनी जखमींच्या मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, उत्तरीय तपासणीसाठी तिघांचे मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, अपघातानंतर इनोव्हा कार चालकाबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. कारचा वेग नेमका किती होता, चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, तसेच अपघात नेमका कशामुळे घडला, याचा तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत. अपघातग्रस्त इनोव्हा कार ताब्यात घेण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गाच्या कडेला थांबणे, शेकोटी करणे किंवा वाहनांची बेदरकार गती यामुळे जीवघेणे अपघात होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. स्थानिक नागरिकांनी या चौकात वेगमर्यादा, स्पीड ब्रेकर तसेच पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.


COMMENTS