नोव्हेंबर महिन्यातही पावसाने राज्यभर हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा...
नोव्हेंबर महिन्यातही पावसाने राज्यभर हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस हजेरी लावताना दिसतोय.
नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी पावसाचा जोर अजूनही ओसरलेला नाही. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्येही पावसाचे वातावरण कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या पार्श्वभूमीवर नवा हवामान इशारा जारी केला आहे. याशिवाय यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अजूनही शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत.
हवामान विभागानुसार, राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
पुणे, सांगली आणि सातारा येथे ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 'मोंथा' चक्रीवादळानंतर आता आणखी एका चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच देशाच्या हवामानात मोठा बदल होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्याने देशातील अनेक भागात पाऊस आणि वादळांची शक्यता निर्माण झाली आहे. ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांत वादळांसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना IMDने पावसाचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी, सांगली, सातारा, आहिल्यानगर आणि पुणे या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट अनुभवता येईल.
यादरम्यान वाऱ्यांचा वेग वाढेल आणि हवामानात चढ-उतार दिसून येतील.
हवामान विभागानुसार, सोमवारपासून सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभाचा परिणाम उत्तर भारत आणि मध्य भारतावर होणार आहे.
उत्तर प्रदेशात सौम्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
पूर्व मध्य प्रदेशात वादळ आणि पावसाची शक्यता कायम असून,
कोकण आणि गोवा किनारपट्टीवर ५ ते ६ नोव्हेंबरदरम्यान वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
यामुळे ८ नोव्हेंबरपर्यंत देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.


COMMENTS