मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पूल पुन्हा एकदा रक्ताने आणि आक्रोशाने न्हाऊन निघाला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गुरुवारी (दि.13) साय...
मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पूल पुन्हा एकदा रक्ताने आणि आक्रोशाने न्हाऊन निघाला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गुरुवारी (दि.13) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, एका नियंत्रण सुटलेल्या अजस्र ट्रेलरने एका चारचाकीला अक्षरशः चिरडले.
या दुर्घटनेत कारमधील प्रवाशांसह एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, एक बाळ आणि चार पुरुषांचा समावेश आहे.सायंकाळी ५.४० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात एका व्यक्तीचा फोन आला. त्याने नवले पुलाजवळ दोन ते तीन वाहनांचा अपघात झाला असून, त्यांना आग लागली असल्याचे सांगितले. अग्निशमन दलाकडून तत्काळ सिंहगड रोड अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळाकडे सोडण्यात आली. गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक कारमध्ये व्यक्ती अकडल्याचे समजले आणि धावाधाव उडाली. सर्वच यंत्रणा कामाला लागल्या.
हा अपघात इतका भीषण होता की, क्षणात गाडीने पेट घेतला आणि आत बसलेल्या संपूर्ण कुटुंबाची... अगदी एका निष्पाप लहान मुलासह... नुसती राख झाली. हाडा-मांसाचा, रक्ताचा माणूस केवळ राख बनून मागे उरला.
या अपघाताची दाहकता इतकी होती की, रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नाही. जळलेली गाडी कोणत्या कंपनीची होती, हेही कळू शकले नाही. पोलिस आणि बचाव पथकाला फक्त जळालेला सांगाडा आणि राखेचे ढीग दिसले. जगण्याची उमेद घेऊन निघालेल्या त्या कुटुंबाचा, त्या लहानग्या बाळाचा आवाज, त्यांचे हसणे, क्षणात या महामार्गावर विरून गेले. मागे उरला तो फक्त आक्रोश आणि जळिताचा वेदनादायी वास. नियंत्रण सुटलेल्या यमदूत बनून आलेल्या ट्रेलरने केवळ एकाच चारचाकीला नाही, तर इतरही वाहनांना धडक दिली. आजूबाजूला जखमींचा आक्रोश, किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज परिसरात घुमत होता. रस्ता रक्ताने माखला होता. या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला.
अग्निशमन नियंत्रण कक्षातून सिंहगड रोड केंद्राची पहिली गाडी पाठवली होती. ती साधारण ५.४८ वाजता घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर एका मिनिटात नवले आणि 'पीएमआरडीए' अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
आग आटोक्यात आणल्यानंतर ट्रकखाली कार दबल्याचे दिसून आले. क्रेन मागवून वाहने हटवण्यात आली. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला होता. रेस्कू व्हॅनमधील कटर, स्प्रेडर व इतर साहित्याच्या मदतीने कारमधील मृतदेह काढण्यात आले. कारमधून दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा मृतदेह काढण्यात आला. ट्रकमधून दोघांचे मृतदेह काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे, अधिकारी प्रभाकर उमरटकर, संतोष भिलारे व ४० जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या वेळी 'पीएमआरडीए'च्या दोन गाड्या आणि एक रेस्कू व्हॅनची मदत झाली.
विविध अपघातांत मृत्यू झालेल्यांची वाहतूक यापूर्वी केली आहे. मात्र, या अपघातात मृतांची अवस्था पाहून खूप दुःख झाले. अशी घटना पुन्हा होऊ नये, हीच प्रार्थना. - सचिन मोरे, रुग्णवाहिका चालक


COMMENTS