राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून संवाद साधला. फडणवीसांनी राज ठाकरे यांची अचानक घेतलेली भेट आणि उद्धव ठाकरे यांना केलेला फोन यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना केलेल्या फोन मागचं कारण सांगितले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात मी दोघांना फोन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,' मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केला होता. मी त्यांना निवदेन केले होते की महाराष्ट्राचे राज्यपाल जे मुंबईचे वोटर आहेत त्यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही एक प्रकारची नॉन पार्टी असल्याचे मानली जाते. तु्म्ही महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी माणसं आहेत. त्यामुळे तुम्ही देखील महाराष्ट्रातला एक वोटर जर देशाचा उपराष्ट्रपती बनत असेल तर तुम्ही त्यांना समर्थन द्या असे मी त्यांना निवेदन केले. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. तर शरद पवारांनी सांगितले की सर्व विरोधक एकत्र येऊन जर उमेदवार उभा करत असेल तर आम्हाला त्यांच्यासोबत गेले पाहिजे.'
शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनदरम्यान नेमकं काय बोलणं झालं हे सांगितले. ते म्हणाले की, 'आमच्या बैठका झाल्या आणि इंडिया आघाडीने बी सुदर्शन यांचा फॉर्मही भरला. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांचा मला काल फोन आला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने सी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली. मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले हे शक्य नाही. मी फडणवीस यांना सांगितले की राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाहीत.'
शरद पवार यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'एनडीएकडे मतांची संख्या जास्त पण आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही. आमच्याकडे मतांची संख्या कमी आहे मात्र आम्हाला चिंता नाही. राधाकृष्णन राज्यपाल असताना देखील सीएम सोरेन यांना अटक झाली होती. आम्ही सरकारचा विचार करत नाही तर निवडणूक आयोगाचा विचार करतो. निवडणूक आयोगाकडून आम्हाला फार काही अपेक्षा नाही. बिहार राजकीयदृष्ट्या जागृत राज्य आहे. राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या आठवड्यात ३०० खासदार रस्त्यावर उतरले तेव्हा आम्हाला अटक केली.'


COMMENTS