बुलढाणा: शिक्षकाने केलेल्या अपमानामुळे आणि आई-वडिलांचा अपमान जिव्हारी लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विवेक राऊत या विद्यार्थ्याने आत्महत्या के...
बुलढाणा: शिक्षकाने केलेल्या अपमानामुळे आणि आई-वडिलांचा अपमान जिव्हारी लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विवेक राऊत या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात घडली आहे.
जय बजरंग विद्यालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने वर्गात विवेक राऊत नावाच्या विद्यार्थ्याला एका प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. शिवाय, शिक्षकाने विवेकच्या आई-वडिलांचाही अपमानास्पद उल्लेख करत “तुझी चड्डी काढायला लागते का?” असे म्हटले होते. आई-वडिलांचा हा अपमान विवेकच्या जिव्हारी लागल्याने त्याने शाळा सोडून घर गाठले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच विवेकच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली. आपल्या मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या शिक्षक गोपाल सूर्यवंशीला संतप्त नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.
विवेक राऊत याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, ‘मी फाशी घेतो, कारण मला सुर्यवंशी मास्तर खुप बोलला. तो माझ्या आई-वडिलांना देखील खूप बोलला म्हणून मी फाशी घेतो.’ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त जमावाच्या तावडीतून शिक्षकाला सोडवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS