केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतः निवृत्तीचे संके...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतः निवृत्तीचे संकेत देत त्यानंतरचे नियोजन काय असणार हे स्पष्ट केले आहे.
तर दुसरीकडे एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंचाहत्तरीच्या मर्यादेची आठवण करुन दिली आहे.
गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकारी संस्थांमधील महिलांसोबतच्या सहकार संवाद कार्यक्रमात बोलताना शहा यांनी अनेक विषयावर भाष्य केले. राजकीय जीवनातून निवृत्त झाल्यानंतर ते वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीसाठी वेळ देण्याची योजना आखल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
नेमंक काय म्हणाले शहा?
मी निवृत्त झाल्यावर माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेती करण्यासाठी देण्याचे मी ठरवले आहे. नैसर्गीक शेती हा एक प्रकारे वैज्ञानिक प्रयोग आहे, ज्यामुळे अनेक फायदे होतात." ते म्हणाले की, "रासायनिक खते दिलेला गहू खाल्ल्याने कर्करोग होतो, रक्तदाब वाढतो, मधुमेह होतो आणि थायरॉईडच्या समस्या निर्माण होतात. सुरुवातीला आपल्याला याबद्दल माहिती नव्हती.
नैसर्गीक शेतीच का?
शरीर निरोगी राहण्यासाठी खते आणि रसायनांशिवाय अन्न खाणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की औषधांची गरज भासणार नाही. दुसरे म्हणजे, उत्पादन वाढते. आम्ही आमच्या शेतात नैसर्गिक शेतीचा अवलंब केला. आज माझे उत्पादन जवळजवळ दीडपट वाढले आहे.
जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा सहसा शेतातून पाणी वाहून जाते. परंतु सेंद्रिय शेतीत एक थेंबही बाहेर जात नाही, तो जमिनीत झिरपतो. कारण नैसर्गिक शेतीमुळे पाणी झिरपण्याचे मार्ग तयार होतात. खतांच्या अति वापरामुळे ते मार्ग नष्ट झाले आहेत. असही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भागवत यांनी पंचाहत्तरीच्या मर्यादेची आठवण करुन दिली
'मोरोपंत पिंगळे, आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रसिद्धी पराडमुखपणे कार्य करून पंच्याहत्तरीनंतर निवृत्त होण्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता. मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहत्तरीची आठवण सांगत सूचक वक्तव्य भागवत यांनी केले आहे.
'पंच्याहत्तरीचा अर्थ मला कळतो. माणसाची पंच्याहत्तरी झाली की, आपण बाजुला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे', असे मोरोपंत तेव्हा म्हणाले होते, अशी आठवण सरसंघचालकांनी यावेळी सांगितली.
त्यांचे विधान आणि अमित शहांनी सांगितेलेला निवृत्तीचा प्लॅन यामुळे राजकीय गोटात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.


COMMENTS