पुणे : जुन्नर तालुक्यातील कोकण कड्यावरुन तलाठ्याने महाविद्यालयीन युवतीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आत...
पुणे : जुन्नर तालुक्यातील कोकण कड्यावरुन तलाठ्याने महाविद्यालयीन युवतीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता दोघांमधील नातेसंबंधही समोर आले आहेत.
श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, (वय 40) आणि रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) असे मृत महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असणारे श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण या दोघांचे मृतदेह सोमवारी जवळपास 1300 फूट दरीत सडलेल्या अवस्थेत आढळले.
पोलिसांच्या तपासात या प्रकरणामध्ये अनेक खुलासे होताना दिसत आहे. मृत तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, दोघांमध्ये काही दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुहेरी आत्महत्येनंतर पोलिसांना सुसाईड नोट सापडल्या होत्या. त्यात तलाठ्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. तर रुपालीनेही आपल्या कुटुंबीयांबाबत खळबळजनक दावे केले होते. रामचंद्र पारधी यांनी सुसाइड नोटमध्ये आई-वडील आणि भावाची माफी मागितली. तर पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे
रामचंद्र पारधी यांची गाडी आणि चपलांचा जोड कोकण कड्यावर आढळल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या 16 जणांनी खोल दरीतून मृतदेह बाहेर काढले. 15 जून रोजी रुपालीच्या अपहरणाची तक्रार नातेवाइकांनी जुन्नर पोलिसांकडे नोंदवली होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज असला, तरी जुन्नर पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरु आहे.
रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडी येथील असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी म्हणून कार्यरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता झाले होते, ते बेपत्ता असल्याने त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती. याशिवाय रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता.
जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसले. यानंतर शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि महिलेच्या चपला आढळून आल्या होत्या. रविवारी (ता. 22) दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून सर्वत्र शोध घेतला असता, रूपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर रेस्क्यू टीमने त्यांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
COMMENTS