पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. भारताकडून पाकिस्तानसोबत असलेले सर्व संबंध तोडले जात आहेत. यातच ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. भारताकडून पाकिस्तानसोबत असलेले सर्व संबंध तोडले जात आहेत. यातच आता, देशातील व्यापारी संघटनांनी निर्णायक पाऊल उचलले.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने पाकिस्तानशी सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय एकमताने घेतला, असे वृत्त एएनआयने दिले. भुवनेश्वर येथे CAIT च्या दोन दिवसीय राष्ट्रीय गव्हर्निंग कॉन्सिलच्या बैठकीत यासंबंधी ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामध्ये 26 राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे 200 हून अधिक व्यापारी लीडर उपस्थित होते.
पाकिस्तानसोबतच्या व्यापारावर बहिष्कार
दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस आणि चांदणी चौकचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी स्पष्ट केले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा आणि पाकिस्तानसोबतच्या व्यापारावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याचा आवाहन करणारा ठराव परिषदेने एकमताने मंजूर केला. CAIT ने दिलेल्या निवेदनानुसार, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून व्यापारी समुदायाने पाकिस्तानसोबतचे सर्व आयात आणि निर्यात तात्काळ थांबवण्याचा संकल्प केला आहे.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्धच्या निर्णायक कारवाईला आता देशातील व्यापाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला. एवढचं नाहीतर या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी निवेदनातून करण्यात आली. दुसरीकडे, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांमध्ये कटुता आली होती. सीएआयटीच्या मते, भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय व्यापार 2018 मध्ये जवळजवळ 3 अब्ज डॉलर्सवरुन 2024 पर्यंत अंदाजे 1.2 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरला.
एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान भारताने पाकिस्तानला सुमारे 500 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या वस्तू- प्रामुख्याने औषधे, रसायने, साखर आणि ऑटो पार्ट्स - निर्यात केल्या, तर आयात फक्त 0.42 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. आता, व्यापाऱ्यांनी पाकिस्तानसोबत व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला, असेही CAIT कडून सांगण्यात आले.
व्यापारी नेत्यांकडून सांगण्यात आले की, शत्रू राष्ट्रासोबत व्यापारीसंबंध सुरु ठेवणे अस्वीकार्य आहे. खंडेलवाल म्हणाले की, "सध्याच्या परिस्थितीत देशभरातील व्यापारी समुदाय एकजूट आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि व्यावसायिक स्वातंत्र्य जपण्यासोबत आवश्यक ते सर्व ठोस निर्णय घेण्यासाठी आम्ही तयार आहोत."
COMMENTS