बीड: बीड शहरातील स्वराज्य नगर भागात राहात असलेल्या एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्ब...
बीड: बीड शहरातील स्वराज्य नगर भागात राहात असलेल्या एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेतला.
त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. त्यांचा कशाप्रकारे छळ केला जात होता, याची सविस्तर माहिती दिली आहे.
धनंजय अभिमान नागरगोजे (रा. केळगाव, ता. केज, जि. बीड) असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. ते मागील १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. 2019 मध्ये राज्य सरकारने या शाळेला 20 टक्के अनुदान घोषित केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. वेतन मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणीना सामना करावा लागत होता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
फेसबूक पोस्टमध्ये म्हटले की…
श्रावणी बाळा तुझ्या बापुला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. मी कधी कुणाला दोन रूपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच, तर तुझ्या बापूला एकदा माफ कर. कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे. तुला अजून काहीच कळत नाही, तुझं वय आहेच किती… तीन वर्षे… तुला काय कळणार…. ज्यांना कळायला पाहिजे होतं, त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.
विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे काम करतोय. मला अजून पगार नाही. आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती. पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्यायच या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर… मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही, तरी पण शक्य झालं तर, जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर… आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला… अशी पोस्ट लिहून नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे.
तसेच विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवत आहे. आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मोठ्या मनाने माफ करा. सर्वांना माझा शेवटचा राम राम…. अशी भावनिक पोस्ट नागरगोजे यांनी लिहिली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
COMMENTS