हळव्या मनाचे कवी व जमीनीशी नाळ जोडलेले साहित्यिक मित्र श्री. तानाजी धरणे,यांची 'हेलपाटा' ही कादंबरी मनाला हेलावून टाकणारी आहे.या का...
हळव्या मनाचे कवी व जमीनीशी नाळ जोडलेले साहित्यिक मित्र श्री. तानाजी धरणे,यांची 'हेलपाटा' ही कादंबरी मनाला हेलावून टाकणारी आहे.या कादंबरीतील प्रत्येक प्रसंग माणसाला विचार करायला भाग पाडतो. एखाद्याच्या जीवनामध्ये किती संकट असतात.हे, या कादंबरीमध्ये पाहायला मिळते.
दुष्काळी भागात जन्माला आलेले हे लेखक. त्यांनी सोसलेले,भोगलेले व गरीबीचे चटके सहन केलेले लेखक व लेखकाचे कुटुंब.अन्नपाण्यावाचून काढलेले वेदनादायी व भयानक दिवस? कष्टाच्या जीवावर त्यांनी खडतर प्रवास करून शोधलेला सुखाचा मार्ग. हा प्रवास वाचून अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
हे लेखक आज चांगल्या पद्धतीने आयुष्य जगत आहेत. तरी देखील भूतकाळात केलेल्या कष्टाची त्यांना पावलो-पावली जाण झाल्याशिवाय राहत नाही. ते आज अभिमानाने सांगतात,' की माझे वडील सालगडी होते. पण जगातले सर्वात बेस्ट बाबा होते.' यावरून त्यांचे, त्यांच्या कुटुंबावर व वडिलांच्यावर किती प्रेम होते हे लक्षात येते. नुसते कुटुंबावरच नाही तर त्यांनी पाळलेली खिल्लारी गाय.या, गायीला तर त्यांनी कुटुंबांची तारणहार व देवाचा दर्जा दिला आहे. मांजर ,कोंबड्या, शेळी यांच्यावरही लेखकाची निराळीच माया असल्याचे दिसून येते.
कुटुंबातील जरी हे धाकट भावंड,असलंतरी छोट्या वयात त्यांनी खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.त्याच बरोबर त्यांनी त्यांचे छंद सुद्धा, जोपासले . लहानपणी त्यांनी वाघ्याचे सोंग घेतले. तेव्हापासून त्यांना त्यांचे मोठे भाऊ अर्थात आण्णा हे लाडाने 'वाघ्या' म्हणून हाक मारायचे.
लेखक म्हणतात, कपड्यावरून जरी माणसाचे व्यक्तिमत्व ठरत असले तरी आपण आपला साधेपणा जपला पाहिजे. अर्थात ते साधी राहणी व उच्च विचारसरणी या विचाराचे समर्थन करताना दिसत आहेत.
भाऊंच्या, नशिबी आलेले दारिद्र्य दूर करताना त्यांची दमछाक व्हायची. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होती. हे लेखकाच्या,लेखणीतून अनेकदा पाहायला मिळते. घरामध्ये पैशाची अडचण होती. बहिणीचं लग्न जमलं होतं. म्हणून बैलं विकायला काढले. बैलं घेऊन बाजारात गेले व एकच बैल विकला. म्हणून दुसरा बैल घेऊन परत घरी याऊ लागले.अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. अशा परिस्थितीमध्ये अंधाऱ्या रात्रीत पडत असलेल्या पावसात लेखकाचे वडील म्हणजेच भाऊ नदीच्या कडेला असलेल्या झाडाला, बैल बांधून तिथेच भिजत बसून राहिले. अंधारामुळे नदीच्या पाण्यात बैल वाहून गेलेला त्यांना समजलेच नाही .रात्रभर भिजल्यामुळे कानाला त्यांच्या दुखापत झाली व ते जन्माचे अधू झाले.
लेखकाचे भाऊ, म्हणजे 'अण्णा' घरामध्ये, समाजात वावरताना,एकदम शांत,संयमी व परिस्थितीचे भान ओळखून वागणारी व्यक्ती. पण जर कोण अन्याय करेल तर त्याला प्रत्युत्तरही ते त्याच पद्धतीने देत असत. एक दिवस विनाकारण कामाचा खडा त्यांचे मालक व मुकादम लावायला लागले. त्याला त्यांनी विरोध केला असता ते अण्णाला, मारण्यासाठी धावले. त्यावेळी त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला.मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. आपण गरीब नक्की आहोत पण लाचार नाही.याची जाणीव त्यांना झाली व अन्नाचा परा चढला. आपल्यासमोर मालक उभा आहे. हे ,ते विसरले व मुकादमाला आणि मालकाला त्यांचा हिसका दाखवला.
लेखकाने त्यांच्या जीवनाचे प्रवास वर्णन करत असताना,अनेक प्रेरणादायी वाक्य या कादंबरीमध्ये अधोरेखित केली आहेत.
संघर्ष केल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाहीत.
संघर्षामुळे व्यक्ती घडतो व व्यक्तीमुळे समाज घडतो.
दुःखाची दरी ओलडंल्याशिवाय, सुखाची हिरवळ दिसणार नाही.
जीवनात कितीही संकटे आली तरी मागे हटायचे नाही.
मलातर वाटतं या वाक्यांनी लेखकाला हे संघर्षमय जीवन जगण्यासाठी बळ दिल असेल.
लहानपणापासूनच लेखकाच्या वाट्याला आलेले कष्ट, उपासमार व हालपेष्ठा. यावर मात करत, प्रतिकूल परिस्थितीत वाट कशी शोधयची हे या कादंबरीमधून शिकायला मिळते. कुटुंबावर आलेली उपासमारीची वेळ निभावून नेण्यासाठी, इयत्ता सातवीत असल्यापासून मुंबईला कामासाठी व धंद्यासाठी 'हेलपाटे', मारायला केलेली सुरुवात नक्कीच कुटुंबाला उभारी द्यायचं काम करते. मुंबईला राहून कमावलेली रक्कम, ज्यावेळी त्यांच्या वडिलांच्या पुढे ठेवली जाते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून खळकन अश्रू वाहतात. कारण त्यांनी जीवनामध्ये एकावेळी एवढे पैसे कधीच पाहिलेले नसतात.
आपण ज्यावेळी घरापासून,आपल्या माणसापासून ,आपल्या गावापासून दूर जातो तेव्हा जग किती विचित्र व किती विशाल आहे याचा प्रत्यय येतो. हे लेखकाचे अनुभव ऐकताना अंगाचा थरकाप उठतो.
आई विषयी लिहताना लेखक कितीतरी वेळा सदगतीत झाल्याशिवाय राहत नाहीत. मित्राविषयी असलेले जिव्हाळा व प्रेम या कादंबरीत कितीतरी वेळा पाहायला मिळते. ते म्हणतात,' रवीचा स्वभाव खूप उमदा होता.मैत्रीसाठी जगणारा माणूस मी त्यांच्यात पाहिला.'
आनोसेवाडीत जन्माला आलेले हे पोर, एक दिवस खडतंर प्रवास करून उपाशी-तपाशी राहून ग्रामसेवक होते. ही बातमी देण्यासाठी त्यांचे अण्णां मुंबईला त्यांना निरोप द्यायला जातात.त्यावेळी भाजी विकण्याची रिकामी पाटी, तराजू, वजन काटे बाजूला सारकवतात व म्हणतात,' बापू! आजपासून तुझ्या डोक्यावरची पाटी गेली.' आपले दुःखाचे दिवस सरले तू ग्रामसेवक झाला.' हे वाक्य ऐकताच अक्षरशः लेखक हंबरडा फोडून अण्णाच्या गळ्यात पडतात. याचवेळी अंधारमय जीवनामध्ये सोनेरी प्रकाशाची पहाट झाल्यासारखी वाटते..
हा प्रवासा अधोरेखित करताना ते वेळोवेळी आई-वडील शेजारी-पाजारी,प्राणी,मित्र व ज्यांनी, सुखी जीवनाचा मार्ग दाखवला असे शिक्षक यांच्या प्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात.
त्यांचे गुरुवर्य श्री. पाखरे सर म्हणतात, 'काट्यांनी भरलेल्या वनातून चाललास म्हणून तुला केवड्याचा सुगंध भेटला..'
ही संघर्षगाथा वाचताना अनेकवेळा डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहतं नाहीत. अशीही १४४ पानांची कादंबरी.हिचे मूल्य फक्त २२५ रू आहे. अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ श्री.शिरीष घाटे,यांनी साकारले आहे.पाठराखण प्रसिद्ध कादंबरीकार श्री. बाबाराव मडावी यांनी लिहून कादंबरीच्या वैभवामध्ये भर टाकली आहे...
'हेलपाटा',ही कादंबरी यशाची सर्व विक्रम मोडीत काढून अनेकांच्या जीवनामध्ये प्रेरणादायी ठरेल असे वाटते..
धन्यवाद..
परशुराम नागरगोजे, जामखेड
संपर्क:- ९८२३०९११४७
COMMENTS