स्त्री शक्ती, नारी शक्ती विविध तुझी रूपे। नमन करतो मी तुला जोडोनी करकमले ॥ प्राचीन काळापासून स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले ...
स्त्री शक्ती, नारी शक्ती विविध तुझी रूपे।
नमन करतो मी तुला जोडोनी करकमले ॥
प्राचीन काळापासून स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले पहावयास मिळते.शिवबा घडविणाऱ्या जगतमाता जिजाऊसाहेब, 1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक अशा राणी लक्ष्मीबाई, उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अहिल्याबाई होळकर, बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करण्यासाठी अनमोल साथ देणाऱ्या रमाई, सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले, मदर टेरेसा, कल्पना चावला तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक स्त्रियांनी खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाची भूमिका बजावली आहे.
प्रसिध्द स्त्रियाच नाही तर सर्वांच्या कुटुंबातील आई, बहीण या सर्वच स्त्रिया आपल्याला मातृत्वाचे, कर्तृत्वाचे उत्तम धडे देत असतात.शेतकरी कुटुंबातील स्त्री मुलांचे पालनपोषण करण्याबरोबर शेतीच्या मशागतीची कामे,जनावरांची देखभाल व संस्कृतीची जोपासना, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियादेखील कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत महत्वाची भूमिका पार पाडतात.चूल आणि मुल ही मानसिकता आता जवळजवळ बदलली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन त्या समाज जडणघडणीमध्ये आग्रेसर आहेत.हे सर्व होत असताना जाणीवपूर्वक स्त्रियांना आजही सन्मानाची वागणूक मिळते का हे पाहणे आवश्यक आहे. सहा महिन्यांपूर्वी मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार भडकलेला असताना जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची कथित धिंड काढली आणि सामूहिक बलात्कार केला.अशा अनेक प्रकारच्या हृदयद्रावक घटना आपल्या ढासाळणाऱ्या नैतिकतेचे विदारक वास्तव समोर उभे करतात. खरच आपण सुधारलो का? आपण आपल्या नैतिकतेची मूल्य विसरलोत का?आईसमान मातृत्वाचा अपमान होईल असे कृत्य पुरुषत्त्वाला काळीमा फासणारे असेल. मात्र आजकाल काय दिसते, आपल्या तोंडातून निघणाऱ्या शिव्याही आई-बहिणीचा त्यांच्या अवयवांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. स्त्रियांच्या बाबतीत होणारे अत्याचार, अपराध पहिले ऐकले कि प्रश्न पडतो कि शिवरायांचे विचार ज्या मातीत रुजले तिथे असे अक्षम्य अपराध कसे होत आहेत ?
जुन्या रुढीतून,परंपरेतून बाहेर येण्याची वेळ आता आलेली आहे. परस्त्रीला मातेसमान मानले जावे,शिवरायांनी सांगितलेला स्त्रियांचा आदर आपणही आचरणात आणावा . कुठे कोणी मुली सोबत , एखाढ्या महिलेसोबत काही चुकीचं होत असेल तर स्वतः पुढाकार घेऊन मदत करावी . कुणा स्त्री सोबत एखाद्या विषयावर काही पटत नसेल तर आपला मुद्दा मांडताना किंवा विरोध करताना स्त्रीदाक्षिण्य नक्की राखावे.
प्रा.प्रदीप बबन चिखले.
श्री.शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर
मो. नं.9730541702
COMMENTS