नवी दिल्ली: पोलिसांनी आज (गुरुवार) पहाटे एन्काऊंटर केले असून, यात सिग्मा गँगच्या चार गुंडांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सिग्मा गँगच्या म...
नवी दिल्ली: पोलिसांनी आज (गुरुवार) पहाटे एन्काऊंटर केले असून, यात सिग्मा गँगच्या चार गुंडांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सिग्मा गँगच्या म्होरक्याचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.
ऐन दिवाळीत एन्काऊंटरची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांच्या कारवाईत बिहारच्या सिग्मा टोळीतील चार मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाले असून, मृतांमध्ये बिहारच्या सीतामढी येथील रहिवासी सिग्मा टोळीचा प्रमुख रंजन पाठक याचाही समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाला हे सर्व गुंड रोहिणी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे २:२० वाजता दिल्लीच्या रोहिणी परिसरातील डॉक्टर आंबेडकर चौक आणि पानसाळी चौक दरम्यान बहादूर शाह मार्गावर बिहार पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाची चार संशयित गुन्हेगारांसोबत चकमक झाली. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. चकमकीनंतर, सर्व आरोपींना दिल्लीच्या रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी चारही गुंडांना मृत घोषित केले.
रंजन पाठक (वय 25 वर्षे, सीतामढी जिल्हा, बिहार), बिमलेश महातो उर्फ बिमलेश साहनी (वय 25 वर्षे, रा. रतनपूर), मनीष पाठक (वय 33 वर्षे रा. मलाहाई) आणि अमन ठाकूर (वय 21 वर्षे, रा. शेरपूर, दिल्ली) असे चकमकीत मृत पावलेल्या गुंडांची नावे आहेत. हे सर्व आरोपी बिहारमधील अनेक गंभीर गुन्ह्यांमधील मोस्ट वॉण्टेड आरोपी होते.


COMMENTS